मुंबई : पोलीस, डॉक्टर्स, नर्स, शासकीय कर्मचारी हे अहोरात्र जनतेची काळजी घेण्यासाठी आपला जीव धोक्यात घालून काम करत आहेत, त्यांचा सन्मान करा, नियमांचे पालन करा, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे. तसेच कोणीही कायदा हातात घेऊ नये तसे कोणी केले तर ते खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला. काही ठिकाणी पोलीस व नागरिकांमध्ये लाठी–काठी वरून झालेल्या प्रकारावर ते बोलत होते.
लॉकडाऊनमध्ये बाहेर पडलेल्या काही जणांना पोलिसांच्या लाठीचा सामना करावा लागला, काही ठिकाणी तर नागरिकांनी पोलिसांशी वाद घातल्याचेही प्रकार घडले, यावरून धनंजय मुंडे यांनी कोणीही कायदा हातात घेतल्याचे खपवून घेतले जाणार नाही असा सूचक इशारा दिला आहे.
मुंडे यांनी याबाबत फेसबुक वरून एक पोस्ट केली आहे. नागरिकांनी कोणत्याच परिस्थितीत घराबाहेर पडू नये. जीवनावश्यक खरेदी किंवा काही अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडायचे असल्यास त्यासाठी सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या ठरवून दिलेल्या वेळेत तेही कुटुंबातील एकच सदस्याने बाहेर यावे. घालून दिलेले नियम हे जनतेच्याच हितासाठी आहेत, त्या नियमांचे पालन केल्यास अशी वेळ येणारच नाही; असे मुंडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.