Ajit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत भाजप आणि शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दोन गट निर्माण झाले. हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगापर्यंत पोहोचले.
त्यानंतर अजित पवार गटच मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून देण्यात आला. 2 जुलै रोजी अजित पवार यांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला. साधारण या घटनेला आता नऊ महिने पूर्ण होतील. त्यानंतर आता अजित पवार यांनी वेगळं होण्याचा निर्णय का घेतला? याबाबतचे पत्र महाराष्ट्रातील जनतेसाठी लिहिले आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच…” असे लिहीत त्यांनी पत्राची सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे या पत्रात अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे देखील कौतुक केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यासोबत जाताना वेगळा विचार केला, त्याबाबत अनेक माध्यमांतून विविध प्रकारे आजही चर्चा होत आहे. याविषयीची माझी नेमकी भूमिका राज्यातील सन्माननीय नागरिकांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं केलेला हा पत्रप्रपंच… pic.twitter.com/3fIlE1DFQU
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) February 25, 2024
अजित पवारांचे पत्र जसंच्या तसं –
– सन 1991 पासून मी राजकीय जीवनात खऱ्या अर्थाने वाटचाल करती आहे. मला राजकारणात कोणी आणले, कोणी मला मंत्रीपद दिले, कोणी संधी दिली याबाबत अनेकदा चर्चा झाली. खरतर मला राजकारणात संधी अपघातानेच मिळाली, त्या काळी राज्यस्तरावर नेतृत्वासाठी एका युवकाची आवश्यकता होती. त्यामुळे कुटुंबीय म्हणून मला ती संधी मिळाली.
– संधी मिळाल्यानंतर त्या संधीची सोने करण्यासाठी मी रात्रीचा दिवस केला. कष्ट व परिश्रम केले. इतर सर्व जाबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करुन समाजकारणासाठी स्वत:ला वाहून घेतले. तीन दशकांपासून अधिक काळ हा प्रवास सुरु आहे. फक्त संधी मिळून चालणार नव्हते तर त्याचा लोकांची कामे होण्यासाठी कसा उपयोग करता येईल यावरच कायम माझा भर राहिला.
– पहाटे पाचपासून काम सुरु करण्याची सवय स्वत:ला लावून घेतली कारण हातात अशलेल्या वेळेत समाजोपयोगी, विधायक व विकासाची कामे वेगाने मार्ग लागावीत. ज्या मतदरांनी भरभरुन प्रेम केलं, विश्वास व्यक्त केला. त्यांचे जीवनमान अधिक कसे उंचावेल यासाठी कायमच मी प्रयत्न केला.
– पहिल्या दिवसापासून राजकारण, समाजकारण करताना इथर कोणत्याही मुद्दापेक्षा विकासालाच सर्वाधिक प्राधान्य दिले. आजही आणि भविष्यातही विकास हाच कायम माझा व माझ्या सर्व सहकाऱ्यांचा एककलमी कार्यक्रम असेल.
– काही काळ सत्ताधारी तर काही काळ विरोधी म्हणून दिवस पाहिले. सत्तेत असताना असलेला कामाचा वेग आणि विरोधक असताना रखडेलेली कामे दोन्हींचा अनुभव घेतला. जर लोकप्रतिनिधी म्हणून काम करायचे असेल तर त्याला सत्तेची जोड हवी, ही वास्तुस्थिती नाकारुन चालत नाही.
– विरारधारा, ध्येयधोरणे यांच्याशी कोणतीही तडजोड न करता विकासकामे वेगाने मार्गी लागवित, याच उद्देशाने वेगळी भूमिका घेतली. यात कोणाचा अवमान करणे, कोणच्याही भावाना दुखावणे, कोणालाही दगा देणे किंवा पाठीत खंजीर खुपसणे असा कोणताही उद्देश अजिबात नव्हता व कधीच नसेल.
– कायमच वडिलधाऱ्यांविषयी आदराची भावना, समवयस्करांना सोबत घेऊन जाणे व युवकांना विविध ठिकाणी संधी देण्याचेच काम माझ्याकडून झाले आहे. आजही मी फक्त भूमिका घेतली आहे. सत्ता असेल तर मतदारसंघासह राज्यातील सर्वच विकासकामे वेगाने मार्ग लागतील ही स्वच्छ भूमिका आहे. यात कोणाचाही कसलाही अनादर करण्याचा अजिबात हेतू नव्हता व नसेल.
– या देशाचा पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जो विकास होतो आहे तो मला महत्त्वाचा वाटला. कणखर नेतृत्व व योग्य निर्णय प्रक्रिया हे त्यांचे गुण मला भावले. माझी व त्यांची कार्यप्रणाली मिळतीजुळती आहे. कामावर आमचे जास्त प्रेम आहे. त्यांच्यासमवेत माझ्या भविष्यताली विकासाच्या ज्या योजना आहेत त्या अधिक प्रभावीपणे प्रत्यक्षात उतरविणे शक्य होईल, असे मला वाटल्याने मी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. या राज्याला विकासात अग्रेसर कसे करता येईल? या उद्देशाने मी ही भूमिका स्वीकारली आहे. मी सत्तेत आल्यानंतर विकासास आलेली गती आपण अनुभवली आहे.
– वडीलधारी किंवा ज्येष्ठांचा अनादर करणे असा हेतू नसून भविष्यात वेगाने लोकांचे राहणीमान कसे उंचवता येईल, मूलभूत पायाभूत सुविधा अधिक सक्षमक कशा करता येतील याचा विचार आहे.
– या पुढील काळातही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणावरही वैयक्तिक स्वरुपाची टीकाटीप्पणी टाळून विकासाची ब्लू प्रिंट या राज्यातील जनतेसमोर घेऊन येईल इतकीच ग्वाही मी यानिमित्ताने राज्यातील जनतेला देऊ इच्छितो. विकासाच्या या वाटेवर सर्व सन्माननीय नागरिकांनी माझ्यासोबत यावं, वडीलधारी मंडळींनी आशिर्वाद घ्यावा असं विनम्र आवाहन करतो.
शरद पवारांच्या नव्या चिन्हाचे रायगडावरून अनावरण
दरम्यान, निवडणूक आयोगना शरद पवार गटाला नवं नाव आणि पक्षचिन्ह दिलं आहे. तुतारी या पक्षचिन्हाचं किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले होते. यानिमित्त 40 वर्षांनंतर शरद पवार रायगडवर गेले होते. यावरून त्यांच्यावर टीका देखील करण्यात आली होती.