टोकियो – टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजीतच भारतीय संघाला पदकाच्या आशा सर्वाधिक होत्या. मात्र, खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे पदकाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
एकेरी गटात सुमार कामगिरी झाल्यानंतर आता भारताच्या नेमबाजांना 10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारातही अपयशाचा सामना करावा लागला. यामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले असून पदकाच्या आशाही संपल्या आहेत.
भारताच्या सौरभ चौधरी आणि मनू भाकर या जोडीने स्टेज 1 मध्ये अव्वल स्थान मिळवत पदकाच्या आशा निर्माण केल्या होत्या. मात्र, स्टेज 2 मध्ये ते सातव्या स्थानावर घसरले गेले आणि भारत पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला.
10 मीटर एअर पिस्तूल मिश्र सांघिक प्रकारात स्टेज 1 मध्ये सौरभ चौधरीने चमकदार कामगिरी केली. त्याने 98,100, 98 असे एकूण 296 गुण मिळवले तर त्याची सहकारी मनू भाकरने 97, 94,95 सह 286 गुण मिळवले. या जोडीने 582 गुणांसह स्टेट 1 मध्ये अव्वल स्थान मिळवले. स्टेज 1 मध्ये भारताची दुसरी जोडी अभिषेक वर्मा-यशस्विनी देसवाल यांना मात्र अपयश आले.
याआधी वैयक्तिक 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात देखील पुरुषांमध्ये सौरभ चौधरी, अभिषेक वर्मा यांना तर महिलांमध्ये यशस्विनी देसवाल, मनू भाकर यांना अपयश आले होते.