टोकियो – टोकियो ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या चिराग शेट्टी व सात्विक साईराज रांकीरेड्डी या जोडीने ब्रिटनच्या बेन लेन व सीन वेंडी या जोडीचा पराभव केल्यावरही त्यांना अनाकलनीय नियमांमुळे उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले नाही. सामन्यात विजय मिळवूनही गटात तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे त्यांना स्पर्धेतून बाहेर जावे लागले. अशी स्थिती ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या बाबतीत प्रथमच निर्माण झाला आहे.
ब्रिटनच्या जोडीविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही त्यांना उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवता आले नाही. कारण प्रत्येक गटातून पहिल्या दोनच संघांना पुढील फेरीत स्थान मिळते. भारताच्या गटात क्रमवारी व गुणांनुसार तैवान आणि इंडोनेशियानंतर तिसऱ्या क्रमांकावर राहिल्यामुळे हे घडले.
चिराग-सात्विक जोडीने लेन आणि वेंडी या जोडीवर 21-17 आणि 21-19 असा सरळ दोन गेममध्ये विजय मिळवला. गटामध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानावर असलेल्या तैवान आणि इंडोनेशियापेक्षा भारताने जिंकलेले सामने कमी संख्येचे असल्यामुळेच त्यांचे स्पर्धेतील आव्हानही संपूष्टात आले आहे. उपांत्यपूर्व फेरीत जाण्यासाठी भारताला ब्रिटनविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे होते. तसेच दुसऱ्या सामन्यात इंडोनेशिया चिनी तैपेई जोडीविरुद्धचा सामना जिंकणे गरजेचे होते. भारताने आपला सामना जिंकला. मात्र, इंडोनेशियाने सामना गमावला. पण तरीही भारताला उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळाले नाही. इंडोनेशियाचे गुणही भारतापेक्षा सरस ठरले.
चिराग-सात्विक जोडीला जिंकूनही स्पर्धेत आपले आव्हान कायम राखता आले नाही. ही जोडी बाहेर पडल्याने आता बॅडमिंटनमध्ये पदकाची आशा केवळ ऑलिम्पिक पदक विजेत्या पी. व्ही. सिंधूकडूनच आहे.