टोकियो : टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने ऐतिहासिक विजय मिळवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. तब्बल ४१ वर्षांनी भारताने हॉकीमध्ये पदक मिळवून दिले आहे. भारताने बलाढ्य अशा जर्मनीचा ५-४ फरकाने पराभव केला आणि कांस्यपदक आपल्या खिशात टाकले. दरम्यान भारतीय संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगने याने या विजयावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
कर्णधार मनप्रीत सिंगने “हे पदक आपल्या देशातील सर्व करोना योद्धे आणि पहिल्या फळीतील कर्मचाऱ्यांसाठी आहे,” अशा प्रांजळ भावना मनप्रीतने सामना संपल्यानंतर व्यक्त केली आहे.
भारताने बलाढ्य जर्मनीचा ५-४ ने पराभव करत ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सुरुवातीला आघाडी घेतलेल्या जर्मनीला भारतीय संघाने जबरदस्त पुनरागमन करत पराभवाची धूळ चारली. दरम्यान यलो कार्डमुळे मैदानात एक खेळाडू कमी असल्याने जर्मनीने मोठा निर्णय घेतला होता. भारतीय संघाची खेळी पाहून जर्मनी गोलकीपरशिवाय खेळली.
भारताकडे ५-४ अशी आघाडी असताना काही करून बरोबरी करण्याच्या उद्देशाने जर्मनीने आपले आक्रमण वाढवण्याचा निर्णय घेतला. भारताची बचावफळी भेदता येत नसल्याचे व अनेक पेनल्टी कॉर्नरवर गोल करता येत नसल्याचे बघून जर्मनीने गोलकीपरशिवाय खेळून एक आक्रमक खेळाडू खेळवण्याचा निर्णय सामना संपायला काही मिनिटे असताना घेतला.
त्यांचा हा निर्णय अचूक ठरण्याची शक्यताही निर्माण झाली. परंतु शेवटच्या सहा सेकंदांमध्ये भारताच्या गोलकीपरने व बचावफळीने अप्रतिम बचावाचे दर्शन घडवले व जर्मनीचे मनसुबे धुळीला मिळवले आणि कांस्यपदकावर नाव कोरले.