पैठण – मला बाळासाहेबांनी, आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली, ती म्हणजे जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. पैठण येथे आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली यावेळी ते बोलत होते. तसेच पैसे देऊन गर्दी जमवल्याच्या आरोपावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली. ही जबरदस्तीने पैसे देऊन जमवलेली गर्दी नाही. ही सर्व प्रेमाने आलेली माणसं आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांची खरी शिवसेना कोणती याचं उत्तर आजच्या विराट सभेने दिले आहे. ही सर्व माणसं पैसे देऊन नाही तर प्रेमाने आली आहेत. माता-भगिनी सकाळी 11 वाजल्यापासूनच मोठ्या संख्येने सभेसाठी बसल्या आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. पुरूषांनाही धन्यवाद दिले पाहिजे ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
ही सच्चा शिवसैनिकांची गर्दी आहे. ही संदीपान भुमरे यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आहे. आम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा घेतलाय त्याला पसंती देणारी ही गर्दी आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, पैठणवासीयांसाठी विविध सुविधांच्या घोषणाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिल्या. मंत्री संदीपन भुमरे यांनी या सभेचे नियोजन केले होते. यावेळी त्यांनी जास्तीत जास्त गर्दी जमवून शक्ती प्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला.