ज्येष्ठ पत्रकार, अनुवादक, कादंबरीकार, नाटककार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा आज स्मृतिदिन. त्यांचा जन्म कर्जत-अहमदनगर जिल्हा येथे 12 जून 1917 रोजी येथे झाला. त्याचे शिक्षण बीए, एलएलबीपर्यंत झाले होते. तथापि, लेखनात आवड असल्याने ते लेखनाकडे वळले तसेच पत्रकार म्हणूनही काम करू लागले.
वसंतराव काणे यांच्या “रोहिणी’ मासिकामध्ये काही काळ त्यांनी संपादक म्हणून काम पाहिले तसेच “सह्याद्री’ मासिकाचे ते दहा वर्षे संपादक होते. लेखक वि. स. खांडेकर यांचे ते मामेभाऊ लागत. वर्ष 1939 मध्ये वकिलीची पदवी मिळवतानाच त्यांचा “नादलहरी’ हा पहिला कथासंग्रह प्रसिद्ध झाला.
खेर स्वतःला प्राध्यापक श्री. म. माटे यांचे शिष्य म्हणवून घेत. पत्रकारितेबरोबर सामाजिक कार्यातही ते आत्मीयतेने सहभागी होत. स. मा. गर्गे यांनी संपादित केलेल्या यशवंतराव चव्हाण आणि पत्रकार या पत्रसंवाद ग्रंथांत समाविष्ट असलेला भा. द. खेर आणि यशवंतराव चव्हाण यांच्यातील पत्रव्यवहार वाचल्यानंतर यशवंतराव व खेर यांच्या लेखन व्यासंगाची कल्पना येते. त्यांचे लेखन विविध विषयांशीही संबंधित आहे, नवे आणि जुने असे सर्व विषय त्यांनी हाताळले. रामायणापासून 1857 पर्यंतच्या अनेक घटना व व्यक्तिरेखा त्यांच्या लेखनाचे विषय होते. त्यांची एकूण 117 पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. “समग्र लोकमान्य टिळक’ या सप्तखंडी ग्रंथाचे भा. द. खेर एक सहसंपादक होते. त्यांच्या लेखनात 16 कादंबऱ्या, 6 कथासंग्रह, 19 चरित्रे, 5 अनुवादित नाटके यांचा समावेश आहे.
वि. दा. सावरकरांच्या जीवनावरील “यज्ञ’ ही त्यांनी लिहिलेली पहिली चरित्रात्मक कादंबरीच्या प्रकाशनापूर्वीच 11 हजार प्रतींची नोंदणी झाली होती. श्रीकृष्ण, चाणक्य, ज्ञानेश्वर, संत तुकाराम, झाशीची राणी, नेपोलियन, पं. नेहरू, लालबहादूर शास्त्री, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशा अनेक व्यक्तिरेखांची चरित्रे लिहिली आहेत. शेक्सपियरच्या “हॅम्लेट’, “किंग लियर’, “विंटर्स टेल’ इत्यादी नाटकांचे अनुवादही त्यांनी केले.
भा. द. खेर यांना हिरोशिमा या दुसऱ्या महायुद्धातील हानी पोचलेल्या घटनेवर कांदबरी लिहायची होती, त्यासाठी त्यांना जपानला जायचे होते. त्यांनी केंद्रीय मंत्री यशवंतराव चव्हाण यांना पत्र लिहिले. पत्र पाठविल्यानंतर 4/5 महिन्यांनी यशवंतरावांचे अचानक पत्र आले. त्यांनी प्रवासासाठी आवश्यक परवानग्या दिल्या होत्या, त्या वेळी इंदिरा गांधी यांच्याशी या विषयावर बोलून संमती मिळवली होती. यशवंतराव यांनी साहित्यिकांबाबतीत खूपच सकारात्मक दृष्टिकोन ठेवला होता. परवानगी व जायची व्यवस्था झाल्यावर खेर हिरोशिमा येथे जाऊन राहिले, त्यावेळी हयात असलेल्या लोकांच्या गाठीभेटी घेऊन तसेच तेथील ग्रंथालयातून शासकीय लष्करी नोंदींचा अभ्यास करून विस्तृत लेखन केले.
पुस्तक लिहून झाल्यावर यशवंतराव चव्हाणांनी प्रस्तावनाही लिहिली होती. “हिरोशिमा’च्या इंग्रजी अनुवादाचे (बेल ऑफ हिरोशिमा) भारताचे राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्या हस्ते प्रकाशन झाले होते. 21 जून 2012 रोजी त्यांचे निधन झाले.