विदर्भाचे कर्मवीर, शिक्षण प्रसारक, पत्रकार, स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील पापळ खेड्यात 27 डिसेंबर 1898 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे मूळ घराणे वतनदार देशमुखांचे आणि आडनाव कदम; पण देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
पंजाबरावांचे प्राथमिक शिक्षण पापळ येथेच झाले. अमरावतीला हिंदू हायस्कूलमध्ये मॅट्रिक होऊन (1918) ते पुण्यात फर्गसन महाविद्यालयात दाखल झाले. पण पदवी घेण्यापूर्वीच ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले (1920). इंग्लंडमध्ये त्यांनी एमए (एडिंबरो), डी.फिल्. (ऑक्सफर्ड) आणि बॅरिस्टर या पदव्या मिळविल्या. “वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गम आणि विकास’ प्रबंधाबद्दल त्यांना डॉक्टरेट मिळाली. ऑक्सफर्ड विद्यापीठात संस्कृतचे संशोधक म्हणूनही काही दिवस काम करून ते भारतात परत आले (1926) व अमरावतीस त्यांनी वकिली सुरू केली.
पंजाबरावांनी वर्ष 1927 मध्ये मुंबईच्या विमलाबाई वैद्य यांच्याशी विवाह केला. विमलाबाई लग्नानंतर बीए, एलएलबी झाल्या. त्यांचा अनेक स्त्रीसंघटनांशी निकटचा संबंध होता. पुढे त्या राज्यसभेवरही निवडून आल्या. पंजाबरावांच्या सर्व सामाजिक कार्यात त्या हिरीरीने भाग घेत असत. पंजाबरावांनी वकिलीबरोबरच सामाजिक व प्रामुख्याने शैक्षणिक कार्यास प्रारंभ केला. वर्ष 1928 मध्ये अमरावतीच्या जिल्हा बोर्डात अध्यक्ष झाले. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक विहिरी हरिजनांसाठी खुल्या केल्या. कर वाढवून येणारा पैसा शिक्षणावर खर्च केला व प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांना खुले करण्यासाठी सत्याग्रह केला.
1930 मध्ये त्यांची प्रांतिक कायदेमंडळात निवड झाली व ते शिक्षण, कृषी, सहकार खात्यांचे मंत्री झाले. वर्ष 1933 मध्ये त्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर अमरावती मध्यवर्ती बॅंकेचे ते अध्यक्ष झाले. त्यांनी बहुजन समाजाच्या विकासासाठी श्रद्धानंद छात्रालय (1926) व श्री शिवाजी शिक्षण संस्था स्थापन केली (1932). त्या शिक्षणसंस्थेने अल्पावधीतच अनेक शाळा, महाविद्यालये आणि वसतिगृहे सुरू केली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात अंदाजे एक हजारांवर शाळा, महाविद्यालये, अभियांत्रिकी, तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशा अनेक महाविद्यालयांचा समावेश आहे. शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या कामामुळे त्यांना विदर्भाचे कर्मवीर म्हणून ओळखले जाते.
वर्ष 1927 मध्ये शेतकरी संघाच्या प्रचारासाठी “महाराष्ट्र केसरी’ हे वर्तमानपत्र सुरू केले व कृषी पत्रकारितेचा पायंडा पाडला. वर्ष 1933 मध्ये शेतकऱ्यांची कर्जातून मुक्तता करणारा कर्ज लवाद कायदा पारित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. वर्ष 1955 मध्ये भारत कृषक समाजाची स्थापना व राष्ट्रीय कृषी सहकारी खरेदी विक्री संघाची स्थापना केली. वर्ष 1960मध्ये दिल्ली येथे जागतिक कृषी प्रदर्शन भरवले. त्यामुळे त्यांना हिंदुस्थानच्या कृषक क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. दिल्ली येथे 10 एप्रिल 1965 रोजी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या स्मरणार्थ अकोला येथे पंजाबराव कृषी विद्यापीठ स्थापण्यात आलेले आहे.