फलटण, (प्रतिनिधी) – भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता यावर्षी वाढदिवस साजरा करणार नसून हार, गुच्छ, फुले याऐवजी शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, पेन आणावेत. आपण केवळ भेटू, गप्पा गोष्टी करु, असे आवाहन विधानपरिषदेचे माजी सभापती आणि फलटण संस्थान चे अधिपती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
गेली अनेक वर्षे गुढीपाडवा आणि माझा वाढदिवस आपण सर्वजण मोठ्या उत्साहाने साजरा करता, तथापि पाऊसमान कमी झाल्याने यावर्षी धरणात अत्यंत कमी पाणी साठे आहेत, विहिरी, ओढे, नाले, तलाव कोरडे पडले असल्याने भीषण दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन यावर्षी वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे.
वाढदिवस म्हणजे सर्वांना भेटण्याचा, एकमेकांची सुख दुःखे जाणून घेण्याचा, जुन्या आठवणींना उजाळा देत नवा मार्ग शोधण्याचा, गुजगोष्टी करण्याचा दिवस, ते टाळता येणार नसल्याने मंगळवार, दि. ९ एप्रिल २०२४ गुढीपाडवा आणि वाढदिवस या निमित्ताने आपण सकाळी १० ते १२ या वेळेत अनंत मंगल कार्यालय, कोळकी (फलटण) येथे भेटू,पण येताना हार, गुच्छ, फुले याऐवजी शालेय साहित्य, वह्या, पुस्तके, पेन आणावेत ही अपेक्षा असून आपण केवळ भेटू, गप्पा गोष्टी करु करु. असे आवाहन रामराजे यांनी केले आहे.