पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – काश्मीरमधील दहशतवाद कधीही डोके वर काढू शकतो, त्यामुळे काश्मीरबाबत अखंड सतर्कता आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार राहुल पंडिता यांनी व्यक्त केले. त्यांनी लिहिलेल्या ‘अ लव्हरबॉय ऑफ बहावलपूर’ या इंग्रजी पुस्तकाचे ‘बहावलपूरचा प्रेमवीर’ हे मराठी भाषांतर प्रकाशित करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेत झालेल्या कार्यक्रमात यावेळी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर, अनुवादक मंजिरी दामले, सरहदचे अध्यक्ष संजय नहार, विश्वस्त शैलेश वाडेकर, अनुज नहार, वंदे मातरम संघटनेचे लेशपाल लवळगे आणि शुभम बुक डेपोचे कुणाल ओंबासे आदी मान्यवर उपस्थित होते.
केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्या मुफ्ती महंमद सईद यांची मुलगी रुबैय्या सईद हिचे अपहरण डिसेंबर १९८९ मध्ये झाले. त्याबदल्यात पाच दहशतवाद्यांना सोडून द्यावे लागले. या घटनेने काश्मीरमधील दहशतवादाची सुरुवात झाली. ‘टेक ऑफ’ घेतला आणि थेट ३० वर्षांनंतर ३७० कलम रद्द झाले हा त्याचा लॅण्डिंग पॉइंट सांगता येतो. मात्र हा दहशतवाद पूर्णतः संपलेला नाही. कारण मसूर अजहरची सुटका असो, किंवा पुलवामातील घटना असो किंवा अन्य घटना असो, या सगळ्यात जी रणनिती दहशतवाद्यांकडून केली जात होती, त्यात जराही बदल झालेला नाही. त्यामुळे काश्मीरबाबत कायम सतर्कता बाळगणे हे हिताचे ठरेल, असे पंडिता म्हणाले.
पाकिस्तान हा भारताचा शत्रू आहे. त्यामुळे तो दगा देणारच. काश्मीरमध्ये वेळोवेळी झालेल्या दहशतवादी कारवायांमध्ये भारताचे सात हजार ८०० सैनिक आजपर्यंत शहीद झालेले आहेत, असे सांगून निंभोरकर यांनी ‘चाचा अफगाणी’ या दहशतवाद्याला संपवल्याची रंजक कथा सांगितली.
पुलवामा हल्ल्याबद्दल अनेकांच्या मनात समज-गैरसमज आहेत. त्याबाबत नेमकी माहिती या पुस्तकाच्या अनुषंगाने वाचकांना मिळेल, असे मत दामले यांनी व्यक्त केले.
पुलवामासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी खबरदारी घ्यायला हवी. तसेच काश्मीरशी असलेले देशाचे नाते जपण्यासाठीही प्रयत्नशील राहिले पाहिजे, असे मत नहार यांनी व्यक्त केले.