आज आपण आपत्तींच्या पूर्वसूचना मिळवण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत आहोत; पण निसर्गसृष्टीतील असंख्य पशु-पक्ष्यांना याची चुणूक खूप आधीच लागते. याची असंख्य उदाहरणे समोर आली आहेत. या संवेदनक्षमतेचा सोदाहरण वेध घेणारा खास लेख.
कोणत्याही पशु-पक्ष्याला योग्यरीत्या प्रशिक्षित करून त्यांची बुद्धिमत्ता पारखल्यास अनेकदा ते बुद्धिमान म्हणवल्या जाणाऱ्या मानवापेक्षाही सरस ठरताना दिसतात.
पशु-पक्ष्यांमध्ये संवेदनशीलता अधिक असते, हे सर्वच जण जाणतात. मालकाच्या-धन्याच्या वियोगाच्या काळात अश्रू ढाळणारे बैल, कुत्रे, मांजरी अनेकांनी पाहिले असतील. याबरोबरच प्राण्यांना निसर्गाचे संकेतही मानवाच्या आधी समजतात. प्राण्यांबाबत आपल्या मनात अशी धारणा असते की, प्राणी हे बुद्धिहीन असतात आणि त्यांना चांगलेवाईटाची समज नसते. मात्र, जर कोणत्याही पशु-पक्ष्याला योग्यरीत्या प्रशिक्षित करून त्यांची बुद्धिमत्ता पारखल्यास तुमच्या लक्षात येईल की, अनेक कामे ते मानवापेक्षाही अधिक चांगले करू शकतात. काही प्राण्यांमध्ये तर अद्भुत संवेदनशक्ती असते. काही उदाहरणे पाहिल्यास यास पुष्टी मिळते.
1904 मध्ये अमेरिकेच्या पश्चिमी बेट समूहाचा पाच हजार फूट उंच माउंट पिरो नावाचा पर्वत ज्वालामुखी बनून फुटला आणि त्याचे टुकडे टुकडे झाले आणि आजूबाजूला फेकले गेले. यात जवळपास 30 हजार व्यक्तींचा मृत्यू झाला. हजारो लोक जखमी झाले आणि करोडो रुपयांचे नुकसान झाले. ही दुर्घटना अचानक झाली आणि तेथील रहिवाशांना याबाबत कोणतीही कल्पना नव्हती. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे येथील पशु-पक्षी अनेक महिन्यांपासून घाबरलेले दिसत होते. रात्री कुत्री-मांजरी एकाच स्वरात ओरडत असत आणि काही जीव सोडत असत. विस्फोट होण्याच्या मुख्य जागेवरून सर्वच्या सर्व साप, कुत्री, मांजरे, कोल्हे आणि इतर दुसरे पशु-पक्षी अगोदरच दुसऱ्या सुरक्षित स्थानावर निघून गेले होते. त्यामुळे त्यांचे दर्शनही दुर्लभ झाले होते. पक्ष्यांनी तर संपूर्ण बेटच खाली केले होते. प्राणी तज्ज्ञ विलियम जे. लाग यांनी प्राण्यांच्या संवेदनाशक्तीबाबत आपले पुस्तक “हाऊ ऍनिमल्स टॉक’ यात सविस्तर सांगितले आहे.
ते या पुस्तकात म्हणतात की, एका गवताळ भागात हरणांचा कळप इतक्या वेगाने आणि अधाशीपणे गवत खात होता की, असं वाटत होते त्यांना कुठेतरी लगेच जायचे होते. अशा प्रकारे अधाशीपणे गवत खाण्यामागचा तर्क लक्षात येत नव्हता. मात्र काही तासांनंतरच बर्फाचे वादळ आले आणि संपूर्ण गवताळ प्रदेशावर बर्फाची चादर पसरली. अनेक दिवस हा बर्फ वितळण्याची शक्यता नव्हती. तेव्हा लक्षात आले की, पूर्वधोक्याची सूचना समजल्यामुळेच हरणांचा कळप इतक्या अधाशाप्रमाणे गवत पोटात ढकलत होता. कारण गवतावर बर्फ पडल्यानंतर बरेच दिवस हरणांचा कळप रवंथ करत आरामात बसला होता. जेव्हा बर्फ पडण्याची शक्यता असते तेव्हा अस्वल आपल्या गुहेत जातात आणि बरेच दिवस आधीच आपल्या खाण्यापिण्याची सामग्री जमा करतात. येथेही त्यांची संवेदनाशक्तीच काम करते.
याच प्रकारे उत्तर कॅनडामध्ये तलाव, सरोवरातील मासे पाण्याच्या पृष्ठभागावर मोठा बर्फ साचण्यापूर्वीच दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी निघून जातात. वियनामध्ये एकदा एक कुत्रा माल चढविणे आणि उतारणाऱ्या क्रेनच्या थोड्या अंतरावर आरामात पहुडलेला होता. अचानक त्याला काय वाटले, तो खडबडून उभा राहिला आणि वेगाने क्रेनच्या दूर पळून गेला. काही क्षणांच्या अवधीनंतर क्रेनची चेन तुटली आणि मोठा लोखंडाचा तुकडा त्याच स्थानावर जाऊन पडला जिथे तो कुत्रा निवांत बसला होता. कुत्रा अशाप्रकारे पळून जाऊन सुरक्षित स्थानी जाणे याचे प्रमाण आहे की, त्याला या अपघाताचे अगोदरच संकेत मिळाले असतील.
एकदा स्पेलनजानी नावाच्या इटालियनने वटवाघळांच्या उडण्याचे निरीक्षण केले. त्यांनी एका खोलीच्या छताला अनेक धागे बांधले आणि त्यात घंट्या बांधल्या कारण त्यामुळे वटवाघळं त्या धाग्यांना धडकू नये म्हणून. त्यानंतर त्यातून एक वटवाघूळ सोडले. वटवाघूळ अनेक वेळ त्या खोलीत उडत होता पण एकदाही एकही घंटी वाजली नाही. खरेतर वटवाघळांची दृष्टी खूपच कमकूवत असते. तरीसुद्धा प्रति सेकंद तीस वेळा ध्वनी तरंग पाठवतात आणि जितक्या वेळात त्याची प्रतिध्वनी येते, तेवढ्या वेळात समोर येणाऱ्या अडथळ्यांबाबत त्यांना माहिती होते आणि ते त्यातून वाचून निघून जातात.
समुद्रात वादळ येण्यापूर्वीच समुद्री पक्षी आकाशात उडून जातात आणि वादळाच्या परिक्षेत्राच्या बाहेर जातात. डॉल्फिन मासे मोठ्या दगडांच्या मागे लपतात. तारा मासे खोलवर डुबकी मारतात आणि व्हेल मासा त्या दिशेने पळून जातात ज्या दिशेने वादळ पोहोचू शकत नाही. हे पूर्व ज्ञान या जलजीवांचे इतके तंतोतंत खरे असते की, तितके हवामान तज्ज्ञांच्या किमती आणि आधुनिक उपकरांकडूनही मिळत नाही.