पंचवीस हजारांवर गाणी गाणारे मोहम्मद रफी यांचा आज जन्मदिन. त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तेलगू, गुजराथी, कन्नड, उर्दू, भोजपुरी या भारतीय तसेच इंग्रजी, अरबी भाषेतही गाणी गायली होती. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1924 रोजी अमृतसर जवळील कोटला सुलतानसिंग या छोट्या गावात झाला.
सुरुवातीचे शालेय शिक्षण कोटला सुलतान सिंग येथे झाले. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. असे म्हणतात की, रफी सात वर्षांचे असताना ते आपल्या मोठ्या भावाच्या दुकानाजवळून जाणाऱ्या एका फकीराच्या मागे जात असत व फकीर जे गाणे म्हणत असे त्याची नक्कल करायचे.
उस्ताद अब्दुलवाहिद खान, पंडित जीवनलाल व फिरोझ निझामी यांच्याकडे शास्त्रीय संगीत शिकले. एकदा त्या काळचे प्रसिद्ध गायक-अभिनेते कुंदन लाल सहगल त्यावेळचे ऑल इंडिया रेडिओ लाहोरमध्ये कार्यक्रम करायला आले होते. मोहम्मद रफी आणि त्यांचे मोठे भाऊही ते ऐकायला गेले. वीज पडल्यामुळे सेहगलने गाण्यास नकार दिला. रफीच्या मोठ्या भावाने संयोजकांना विनंती केली की, मोहम्मद रफी यांना गाण्याची संधी द्यावी जेणेकरून गर्दी शांत होईल. त्याला परवानगी मिळाली आणि वयाच्या 13 व्या वर्षी मोहम्मद रफी यांचे हे पहिले सादरीकरण होते. श्रोत्यांमध्ये त्या काळातील प्रसिद्ध संगीतकार श्याम सुंदर यांनीही ते ऐकले आणि ते खूप प्रभावित झाले. त्याच वेळी लाहोर आकाशवाणी वरून त्यांना गाण्यासाठी बोलाविले गेले.
वर्ष 1944 मध्ये गुल बलोच या चित्रपटात त्यांनी गीत गायले, त्यानंतर रफी वर्ष 1944 मध्ये मुंबईला आले व त्यांनी भेंडी बाजार परिसरात दहा बाय दहा फुटांची खोली भाड्याने घेतली. कवी तन्वीर नक्की यांनी त्यांची अब्दुर रशीद कारदार, मेहबूब खान आणि अभिनेता-दिग्दर्शक नजीर यांच्यासह अनेक चित्रपट निर्मात्यांशी ओळख करून दिली.
त्यावेळी लाहोर येथून आलेले संगीतकार श्याम सुंदर मुंबईत होते आणि त्यांनी रफी यांना जी. एम. दुराणी यांच्यासोबत “आजी दिल हो काबू में तो दिलदार की ऐसी तैसी…’ हे द्वंद्वगीत गाण्याची संधी दिली. “गांव की गोरी’, हे रफींचे हिंदी चित्रपटातील पहिले रेकॉर्ड केलेले गाणे ठरले. मुंबई येथे आल्यानंतर भारतातील सर्वच आघाडीच्या संगीतकारांकडे त्यांनी गायन केले. त्यांचा आवाज गुरू दत्त, दिलीप कुमार, देव आनंद, भारत भूषण, जॉनी वॉकर, जॉय मुखर्जी, शम्मी कपूर, राजेंद्र कुमार, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, जितेंद्र आणि ऋषी कपूर, मिथुन चक्रवर्ती, गोविंदा यांच्यावर चित्रीकरणावेळी प्रभावीपणे वापरला गेला.
सी. रामचंद्र, रोशन, जयदेव, खय्याम, राजेश रोशन, रवींद्र जैन, बप्पी लाहिरी, सपन जगमोहन, टी. व्ही. राजू, एस. हनुमंता राव, उषा खन्ना, सोनिक ओमी, चित्रगुप्ता, एस. एन. त्रिपाठी, एन. दत्ता आणि आर. डी. बर्मन या संगीतकारांसाठी त्यांनी गीते गायली. शाम फिर क्यूँ उदास है दोस्त/तू कहां आस पास है दोस्त हे गीत त्यांच्या मृत्यूच्या काही तास आधी रेकॉर्ड केले गेले. मोहम्मद रफी यांचे 31 जुलै 1980 रोजी निधन झाले.