वायफळ खर्च टाळून शेती व्यवसाय चोख करा
चंद्रपूर, दि. 23 – महाराष्ट्रात आपल्याला ताठ मानेने जगावयाचे असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सार्थकी लावावयाचा असेल तर वायफळ खर्चाला फाटा देऊन शेती व्यवसाय चोख केला पाहिजे, असे आवाहन कृषीमंत्री शरद पवार यांनी आज ताडाळी येथे केले.
चंद्रपूर जिल्ह्यातील 40 हजार एकरांपैकी निम्म्या जमिनीत प्रतिकूल हवामानामुळे पेरणी झाली नाही. आजची पिरस्थिती लक्षात घेता शेतीची प्रगती म्हणजे देशाची प्रगती होय. शेतकऱ्यांनी नव नवीन बी बियाणांचा, नवीन खतांचा आणि आधुनिक तंत्राचा उपयोग शेती करताना केला पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
चित्रपट लोकशिक्षणाचे साधन
नवी दिल्ली – चित्रपट हे लोकशिक्षणाचे साधन आहे. चित्रपट उद्योगाशी संबंधित असलेल्या व्यक्तींनी त्यांच्यावर फार मोठी सामाजिक जबाबदारी आहे या गोष्टींचा विसर पडू देऊ नये, असे विचार राष्ट्रपती फकरुद्दीन अली अहमद यांनी व्यक्त केले.
राष्ट्रपती पुढे म्हणाले की, व्यावसायिक यश हे त्याला सामाजिक उद्दिष्ट व राष्ट्रीय ऐक्याची जोड दिली तरच चांगले व टिकाऊ ठरते. याकडे चित्रपट व्यावसायिकांनी लक्ष द्यावे. त्यांनी सवंग करमणूक वा लोकप्रियता यांच्या आहारी कदापि जाता कामा नये. धर्मनिरपेक्ष, समाजवादी व प्रागतिक समाज उभारणीस मदत होईल असे वातावरण निर्माण करण्यास साहाय्यभूत ठरतील, असे चित्रपट तयार करणे हे चित्रपट उद्योगाचे कर्तव्य आहे.