नगर, (प्रतिनिधी) – जिल्ह्यात वीजचोरी व अनधिकृत वीज वापराविरोधात महावितरण विभागाने कंबर कसली आहे. वीज चोरी विरोधात ठोस पाऊले उचलीत कारवाईचे सत्र सुरु केले आहे. जिल्ह्यात आकस्मिक व धडक कारवाई करत १२ विविध भरारी पथकांनी शेगाव उपविभागातील परिसरात तीन दिवसात सुमारे २ कोटींची वीज चोरी उघडकीस आणली आहे. या कारवाईमध्ये जिल्ह्यातील दोन ऑईल मिल कंपन्यांची सुद्धा वीज चोरी मध्ये समावेश असल्याचे उघड झाले आहे.
जिल्ह्यात काही भागात वीज चोरी होत असल्याची माहिती दक्षता आणि सुरक्षा अंमलबजावणी विभागाला प्राप्त झाली होती. याची तपासणी करण्यासाठी महावितरणच्या सुरक्षा अंमलबजावणी विभागाचे कार्यकारी संचालक विनायक नराळे आणि उपसंचालक सुमित कुमार यांनी सहाय्यक संचालक बबन साठे यांच्या नेतृत्वाखाली १२ तपासणी पथकांची स्थापना केली.
या तपासणी तथा भरारी पथकाने मोहीम राबवित जिल्ह्यातील लघुदाब वीज ग्राहकांच्या विद्युत मीटरची तपासणी करून वीज चोरी उघडकीस आणली. यामध्ये महावितरणच्या विविध भरारी पथकाकडून संशयास्पद २५० विद्युत ग्राहकांच्या वीज मीटर संचाची व परिसराची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १६३ ग्राहकांकडे वीज चोरी तर ६ ग्राहकांकडे अनियमितता उघडकीस आली.
या मोहिमेत जिल्ह्यातील गौरी ऑईल मिल आणि शिवकृपा ऑईल मिल या दोन ऑईल मिल कंपन्यांनी वीज चोरी केल्याचे निदर्शनास आले. सदर ग्राहकांना देय असलेले निर्धारण व तडजोड रकमेची देयके देण्यात आली असून त्यांनी निर्धारित मुदतीत न भरल्यास पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. वीजहानी, गळती व वीजचोरी कमी करण्यासाठी महावितरण सातत्याने प्रयत्नशील असून वीज मिटरमध्ये हस्तक्षेप करून थेट वीजचोरी करणा-यावर विद्युत कायद्याच्या कलमान्वेय कारवाई करण्यात येते आहे.
वीज देयक न भरणाऱ्या ज्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला अशा ठिकाणी सुद्धा बेकायदेशीर वीज वापर करताना आढळल्यास त्यांचे विरुद्ध सुद्धा कारवाई करण्यात येते. वीजचोरी व गैरप्रकार याविरोधात अशाप्रकारे गोपनीय पद्धतीने, सामूहिकरीत्या आणि सातत्याने आकस्मिक कारवाई करण्यात येणारअसून तरी ग्राहकांनी वीजचोरी, अनधिकृत व गैरवापर टाळून अधिकृत वीज जोडणी घेण्याचे आवाहन वेळोवेळी केले आहे.