पुणे {प्रभात वृत्तसेवा} – सलग सुट्टया, त्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षा संपल्या आहेत. त्यामुळे लोणावळा, पवना, महाबळेश्वर, पाचगणीसह कोकण-गोव्यात पर्यटनासाठी जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मुंबई-पुणे-सातारा महामार्ग आणि सातारा-कोल्हापूर महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढल्याने ठिकठिकाणी कोंडी झाली. टोल नाक्यांवर बराचवेळ जात आहे.
गुड फ्रायडेची सुट्टी आणि त्याला जोडून आलेला शनिवार-रविवार सुट्टीचा दिवस, त्यामुळे पर्यटनाचे नियोजन केलेले कुटुंबिय पहाटेपासूनच घराबाहेर पडले. त्यामुळे पुण्याहून लोणावळा, खोपोली, पवनानगर आणि मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी अधिक होती. तर मुंबई, पुण्याहून महाबळेश्वर, पाचगणी, यासह कोकण-गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांमुळे महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ होती. पर्यायाने टोल नाके, घाट रस्ता यासह बाजारपेठा आणि गाव परिसरातून जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांची कोंडी झाली होती.
यावेळी खंडाळा तसेच भोरघाट येथे महामार्ग पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत होते. तर, कोंडी झाल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूकही थांबविण्यात आली. त्यानंतर पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना सर्व मार्गिकांवरुन सोडण्यात आले.
पुण्याकडे जाण्यासाठी मार्गिका उपलब्ध झाल्याने घाट क्षेत्रातील वाहतूक दुपारनंतर सुरळीत झाली. शुक्रवारी सकाळपासून खंडाळा आणि लोणावळा परिसरात मोठ्या संख्येने पर्यटकांची वाहने दाखल झाली. त्यामुळे लोणावळा शहरात देखील वाहतूककोंडी झाली.