पुणे – लाडक्या गणपतीबाप्पाचे आगमन आणि गौराईंच्या पूजेसाठी पुण्यातून गावी जाणाऱ्या चाकरमान्यांसह त्यांच्या कुटुंबीयांची शनिवारी एकच धांदल दिसून आली. प्रवाशांच्या गर्दीमुळे स्वारगेट, पुणे स्टेशन आणि शिवाजीनगर (वाकडेवाडी) एसटी स्थानके फुलली होती. दरम्यान, प्रवासी आणि बस संख्या याचा मेळ घालताना एसटी अधिकाऱ्यांची धांदल उडाली. गर्दी पाहून काहींनी खासगी वाहनांनी गावचा रस्ता धरला.
नोकरी, शिक्षणासासह कामानिमित्त पुण्यात आलेले नागरिक गणेशोत्सव आणि गौराईंच्या पूजेसाठी गावी कुटुंबासह जातात. त्यामुळे रेल्वेसह एसटीला अधिक पसंती असते. दोन ते तीन महिने आधिच बुकींग केले जाते. तर एसटी विभागाकडूनही जादा बसेसचे नियोजन केले जाते. दरम्यान, मंगळवारी बाप्पाचे आगमन म्हटल्यावर सोमवारपासून सुट्टी टाकली. त्यात शनिवार आणि रविवार सुट्टी असल्यामुळे प्रवाशांनी दि. 15 च्या रात्रीपासूनच बसस्थानकांवर गर्दी केली आहे. शनिवारी (दि. 16) सकाळपासून स्वारगेट आणि शिवाजीनगर स्थानकावर प्रवाशांचा महापूर आला होता.
कोकणासह कोल्हापूर, सातारा, सांगली, नगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नाशिक, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, धुळे, पंढरपूर यासह अन्य भागांत जाणाऱ्या प्रवाशांनी गर्दी अधिक होती. स्थानकातून सुटणारी प्रत्येक बस भरून जात असल्याने काही जणांना उभे राहून जावे लागले.
महामार्गावरील कोंडीमुळे बस उशिरा
सलग सुट्टी आणि गणेशोत्सव यामुळे सकाळपासून शहरासह महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झाली होती. त्याचा परिणाम एसटीची सेवेवर झाला, काही प्रमाणात सेवा विस्कळीत झाली. बहुतांश बस या वेळेच्या एक ते दोन तास उशिराने धावत असल्याचे प्रवाशी वैतागले. गर्दी आणि बस वेळेत येत नसल्याने काही प्रवाशांनी बुकिंग कॅन्सल करून खासगी वाहनाने गेले.
अन्य मार्गांवर बस अपुऱ्या
कोकण विभागासाठी पुण्यातून काही बस ठाणे, मुंबईला पाठवण्यात आल्या. त्यामुळे पुण्यातील प्रवाशांची वाढती संख्या पाहता बस अपुऱ्या पडू लागल्या. यावेळी जिल्ह्याच्या स्थानकातून बस मागवण्यात आल्या. तर सातारा डेपोतूनही बस मागवल्या. मात्र, प्रवशांची वाढत्या संख्येपुढे बस अपुऱ्या पडू लागल्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.
तिकिटासाठी दूरवर रांगा
विनावाहक, विनाथांबा या विशेष बससेवेला प्रवाशांचा नेहमीच प्रतिसाद असतो. पण, शनिवारी पुणे-सातारा, बारामती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नगर आदी मार्गांवरील बसेसच्या तिकिटासाठी प्रवासी रांगेत थांबले होते. स्वारगेट येथे ही रांग थेट स्थानकाबाहेर मुख्य रस्त्यापर्यंत गेली होती. त्याचवेळी बारामतीच्या प्रवाशांच्या रांगेने संपूर्ण प्लॅटफॉर्मला वळसा घातल्याचे दृश्य होते. पण, असे असतानाही प्रशासनाने विशेष सुविधा उपलब्ध केली नव्हती.
तासन्तास बसची प्रतीक्षा
मुंबई, ठाणेहून सातारा, कोल्हापूरला जाणाऱ्या एसटी बससाठी अनेक प्रवासी वाकड, एनडीए चौक, वारजे, नवले पूल तर स्वारगेटहून सुटणाऱ्या बसेस कात्रज येथून मिळविण्यासाठी प्रवासी थांबतात. मात्र, स्थानकातूनच बस भरून येत असल्यामुळे एसटी चालक याठिकाणी बस थांबवत नाहीत. त्यामुळे अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना तासन्तास बसची वाट पाहत उभे राहावे लागत आहे, त्यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.