पुणे – भारतात वाघांची संख्या वाढत आहे. पण ही ठिकाणे विखुरलेली आहेत. वाघांना अभयारण्यात रहावेसे वाटणे, प्रजनन करता यावे, असे अधिवास तयार करणे महत्वाचे आहे. नामिबियातून भारतात चित्ते आणणे हा सकारात्मक प्रयोग असून, त्याला वेळ दिला पाहिजे. प्राणी विश्वात नवनवीन प्रयोग होत राहिले पाहिजेत. जंगल बघायला शिकले पाहिजे, असे मत राज्याचे माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये यांनी बुधवारी व्यक्त केले.
भारतातील वन्यजीव संवर्धनासाठी राबवल्या जाणाऱ्या महत्वाच्या प्रकल्पांपैकी ‘प्रोजेक्ट टायगर’ला’ पन्नास वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून वन्यजीव संवर्धनाच्या या यशस्वी प्रकल्पाच्या सुवर्ण महोत्सवाचे कौतुक करण्यासाठी ‘जीविधा’ संस्थेतर्फे आयोजित भित्तीपत्रक प्रदर्शनाचे उद्घाटन लिमये यांच्या हस्ते झाले.
२९ ते तीन डिसेंबर या कालावधीत यशवंतराव चव्हाण कलादालन, कोथरूड, पुणे येथे ‘व्याघ्र प्रकल्पाची पन्नास सोनेरी वर्षे’ या संकल्पनेवर आधारित प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाद्वारे वाघांच्या संवर्धनात ‘ व्याघ्र प्रकल्पांची’ भूमिका, स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठीचे प्रयत्न, व्याघ्र प्रकल्पांसमोरील भावी काळातील आव्हाने यासारख्या विषयांची माहिती पोस्टरद्वारे करून दिली जात आहे.
जीविधा संस्थेचे अध्यक्ष राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले. वृंदा पंडित यांनी आभार मानले. राजेंद्र आवटे, प्रज्ञा सातारकर, अभिजित ताम्हणे आदी उपस्थित होते. यावेळी ‘कान्हा द प्रोटेक्टिंग पॅराडाईज ‘ या माहितीपटाचे प्रसारण करण्यात आले. संगीता राठी यांनी सूत्रसंचालन केले.
प्राण्यांचे अस्तित्व सगळ्यासाठी गरजेचे आहेत. वाघाचे अस्तित्व हे चांगल्या परिसंस्थेचे लक्षण आहे. म्हणून वाघांचे रक्षण केले पाहिजे. वाघांना एका अभयारण्यातून दुसऱ्या अभयारण्यात जाण्यासाठी आवश्यक कॉरिडॉर जपले पाहिजेत. वाघाकडून माणूस मारला जातो, तेव्हा मानवी चुका त्यात असण्याची शक्यता जास्त असते.
अभयारण्यात बंदी असलेल्या भागात माणसांनी जावू नये.बिबट्यापासून जपण्यासाठी काळजी घेण्याचे उपाय लोकांनी ऐकले पाहिजेत.गवा शहरात आला तरी गर्दी करून संकट निर्माण करता कामा नये. वन खात्याला काम करु द्यावे, असे लिमये म्हणाले. वन्य प्राण्यांना पाहण्यासाठी जंगलात गेले पाहिजे. जंगले आणि प्राण्यांचे महत्त्व सांगा. पाणी मुरवणे हे जंगलाचे काम आहे. हेही महत्त्वाचे कारण आहे. शहरात झाडाचे आच्छादन वाढवले पाहिजे, असेही लिमये यांनी नमूद केले. पंडित यांचेही भाषण झाले.