जेजुरीचा खंडेराया हे अनेक मराठी माणसांच्या घराण्याचे कुलदैवत आहे. घरात नवीन लग्नकार्य झाल्यावर कुलधर्मकुलाचार म्हणून जागरण गोंधळ घालणे ही अनेक घराण्यांची चालत आलेली सांस्कृतिक परंपरा आहे. या जागरण-गोंधळातील प्रमुख दोन व्यक्ती म्हणजे वाघ्या आणि मुरळी. आता वाघ्या आणि मुरळी म्हणजे कोण? या संदर्भात “मल्हारीमार्तंड विजय’ ह्या ग्रंथाच्या 37 आणि 38 व्या अध्यायात जी माहिती आलेली आहे ती अशी की- मल्हारी मार्तंडाचा एक अजामेळ नावाचा धनगर भक्त होता. तो मेंढ्यापालन करून आपला चरितार्थ चालवीत असे. मेंढ्या रानात चरायला सोडल्या की अजामेळ सतत शिवनाम जपात दंग होऊन जात असे.
एकदा त्याने मेंढ्या रानात चरायला सोडल्या आणि तो शिवनामस्मरणात दंग झाला. इकडे वाघांनी मेंढ्यांवर हल्ला केला आणि अनेक मेंढ्या मारून टाकल्या. तेव्हा मार्तंड भैरवाने त्या मेंढ्या जिवंत केल्या. आपली अनेक कुत्री वाघांच्या मागे पाठवली. त्यांनी वाघांना घेरले आणि देवाजवळ आणले. देवांनी त्या शरण आलेल्या वाघांना तुम्ही माझे गुणगान करीत इमानी कुत्र्याप्रमाणे सेवक होऊन राहा, असा त्यांना आदेश दिला. मल्हारीचे जे इमानी सेवक तेच वाघ्या.
पांढरे धोतर, सदरा, कमरेला गुंडाळलेला घमशा. गळ्यात पिवळ्या रंगाचे सूत, कपाळी भंडारा आणि मुखी खंडोबाच्या नावाचा गजर हे ह्या देवभक्तांचे दर्शन. तसेच मुरळीच्या संदर्भात जी माहिती मिळते ती अशी की लोक मल्हारीकडे संतती लाभासाठी नवस करतात. काही लोक आपले प्रथम कन्यारत्न देवास त्याची जन्मभर सेवा करण्यासाठी अर्पण करतात. तिला मुरळी असे म्हणतात. ती मल्हारीच्या जागरण गोंधळात आपली नृत्यसेवा देवाच्या चरणी अर्पण करीत असते.
या मुरळीच्या संदर्भात ह्याच ग्रंथाच्या 56व्या अध्यायात अशी माहिती मिळते की इंद्र दरबारातील तिलोत्तमा नावाच्या एका नर्तकीला आपल्या नृत्यकलेचा गर्व झाला. तिने देवेंद्राच्या आज्ञेचा अनादर केला. तेव्हा इंद्राने तिला “तू भूलोकी जाशील, सारी नृत्य कला विसरशील’, असा शाप दिला.
क्षमा मागत तिने उ:शाप मागताच इंद्राने तिला उ:शाप दिला की जेव्हा कृष्णाचा अवतार होईल, तेव्हा तो तुला मुरली या एका वाद्याच्या रूपाने जवळ करेल. पुढे मल्हारीचा अवतार होईल तेव्हा त्याच्या समोर नृत्य गायन करून तू त्याची सेवा करशील. कृष्ण अवतारातली मुरली हीच खंडोबाची सेवक मुरळी होय.