नवी दिल्ली – भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या शुक्रवारपासून दिल्ली येथील अरुणजेटली स्टेडियमवर होत असलेला दुसरा कसोटी सामना पाहण्यासाठी तोबा गर्दी होणार आहे. या सामन्याची सर्व तिकिटे तासाभरातच संपल्याने बीसीसीआयनेही समाधान व्यक्त केले आहे.
तब्बल पाच वर्षांच्या खंडानंतर दिल्लीत कसोटी सामना होत असल्याने चाहत्यांनी तिकिटे मिळवण्यासाठी तुडुंब गर्दी केली होती. या मैदानाची क्षमता 40 हजार प्रेक्षकांची आहे व त्यातील 24 हजार तिकिटे विकली गेली आहेत.
तसेच जवळपास 8 हजार तिकिटे सदस्यांना तसेच अन्य काही संस्थांतील सदस्यांना पास म्हणून देण्यात आली आहेत. या व्यतरिक्त व्हीआयपींसाठी काही तिकिटे व खेळाडूंचे कुटुंबीय तसेच सुरक्षा रक्षक यांच्यासाठीही काही तिकिटे राखीव ठेवली गेली आहेत.
या मैदानावर अखेरचा कसोटी सामना 2017 साली झाला होता. त्यामुळे प्रेक्षकांनाही आता या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यातच 2020 सालापासून जगभरात परसलेल्या करोनाच्या धोक्यामुळेही राजधानीत सामने कमी संख्येने खेळवले गेले.