सातारा – जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये तीन करोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी मंगळवारी दिली. गेल्या पाच-सहा महिन्यांमध्ये प्रथमच करोनाबळींची दिवसातील संख्या पाचपेक्षा कमी झाली आहे.
त्यामुळे जिल्हा प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला असला तरी करोनाबळी होऊच नयेत, म्हणून आणखी प्रयत्न व्हायला हवेत. दरम्यान, सोमवारी (दि. 9) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार जिल्ह्याचा “पॉझिटिव्हटी रेट’ सात टक्क्यांच्या आतच राहिला आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना म्हसवड, ता. माण येथील 60 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना धोंडेवाडी, ता. खटाव येथील 80 वर्षीय पुरुष व सातारा येथील 71 वर्षीय महिला, अशा एकूण तीन बाधितांचा मृत्यू झाला. आता जिल्ह्यातील करोनाबळींची एकूण संख्या 1621 झाली आहे.