चिंबळी -खेड तालुक्यातील काही गावे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे; परंतु खेड तालुक्यातील कोणतेही गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्यास आमचा विरोध आहे, त्यापेक्षा चाकण-राजगुरूनगर-आळंदी मिळून स्वतंत्र महानगरपालिका करा, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.
हवेली, मावळ मुळशीसह खेड तालुक्यातील आळंदी, चिंबळी, कुरूळी, मोई, निघोजे, महाळुंगे इंगळे, मेदनकरवाडी, नाणेकरवाडी, खराबवाडी आदी गावांचा समावेश करावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका अनुकूल आहे, तसा प्रस्ताव तत्कालीन आयुक्तांनी राज्य सरकारकडे पाठवला आहे, परंतु तो लालफितीत आडकला आहे.
तर आता नव्याने या प्रस्तावाचा विचार करून वरील तालुक्यातील गावे महापालिकेत समाविष्ट करावी अशी मागणी करण्यात आली आहे. मात्र, यास या गावांचा विरोध असून भविष्यात हा प्रश्न उग्र रुपही धारण करण्याचा प्रश्न निर्माण होत आहे.
चाकण नगरपरिषदेची हद्दवाढ करून खेड तालुक्यातील 16 गावे मिळून चाकण नगरपालिका करण्यात यावीत. हा प्रस्ताव पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. चाकण महापालिकेबरोबरच महापालिकेतही समाविष्ट होण्यास या 16 गांवचा विरोध आहे. वरील गावांतील ग्रामपंचायतीने ही ठराव करून पालिका हद्दीत गावे समाविष्ट करण्यास विरोध केला आहे.
चाकण, आळंदी आयुक्तालयात नको
खेड तालुक्यातील कोणतेही गाव महापालिका हद्दीत समाविष्ट करून दिली जाणार नाही. चाकण-राजगुरूनगर-आळंदी स्वतंत्र महापालिका करण्यात यावी, अशी मागणी आहे, याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे. तसेच चाकण-आळंदी पोलीस ठाणे ही पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात सहभागी केली आहे, त्यामुळे खेड तालुक्यातील नागरिकांवर अन्याय झाला आहे. यामुळे अनेक गैरप्रकार वाढले आहे ती बंद करण्याबाबत गृहमंत्री अनिल देशमुख यांना निवेदन देण्यात आले आहे.
चाकण नगर परिषद किंवा पिंपरी-चिंचवड महापालिकेत आमच्या गावांचा समावेश कदापी करू नये. आमच्या गावांचा विकास करण्यास स्थानिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे सुरू आहे.
– विलास कातोरे,
माजी सभापती, खेड बाजार समिती तथा स्थानिक रहिवासी (चिंबळी)