वडगाव रासाईत आगीचा फटका : मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबाची उपासमार
मांडवगण फराटा -वडगाव रासाई (ता. शिरूर) येथील साकराई वस्ती परिसरात कच्च्या स्वरूपात बांधलेल्या तीन घरांना आग लागून त्या घरातील जीवनावश्यक साहित्य जळून सहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे भिल्ल समाजातील तीन कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे.
आसाराम पवार, कृष्णा पवार, बाळू पवार ही भिल्ल समाजाची तीन कुटुंबे मागील 25 वर्षांपासून मोलमजुरी करून गुजरान करीत आहेत. त्यांनी येथे शेती मालकाच्या शेतातच राहण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात कुडाची घरे बांधली आहेत. गुरुवारी (दि. 13) रात्री झोपल्यानंतर साडे अकराच्या दरम्यान आग लागल्याचे कुटुंबप्रमुखाच्या लक्षात आले. प्रसंगावधान साधून त्यांनी आरडाओरड करून सगळ्यांना जागे केले. बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते.
यादरम्यान काही व्यक्तींना आगीच्या झळा लागून दुखापतही झाली. कपडे, भांडी, धान्य, कागदपत्रे व काही रोख रक्कम खाक झाली. संबंधित कुटुंबातील सदस्यांना अंगावरील कपड्यासह बाहेर पडावे लागले. ग्रामसेवक राजाराम रासकर, तलाठी पांडुरंग कोळपे यांनी पंचनामा केला. यावेळी सरपंच निर्मला ढवळे, उपसरपंच सुरेश चव्हाण, मुकुंद ढवळे, रावसाहेब शेलार यांनी जळीत कुटुंबाला मदत करून धीर दिला.