नवी दिल्ली – देशातील तीन कोटी लोकांनी प्राप्तिकर विवरण 25 जुलैपर्यंत सादर केले आहे असे माहिती प्राप्ती कर विभागाकडून देण्यात आली. त्याचबरोबर आता विवरण भरण्याची शेवटची तारीख जवळ आली असल्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी शक्य तितक्या लवकर विवरण सादर करावे असा आग्रह प्राप्ति कर विभागाने पुन्हा एकदा केला आहे.
विवरण सादर करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 अशी आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे विवरण सादर करण्याची शेवटची तारीख वाढवून 31 डिसेंबर 2021 करण्यात आली होती. त्या तारखेपर्यंत गेल्यावर्षी 5 कोटी 89 लाख लोकांनी विवरण सादर केले होते. गेल्या आठवड्यामध्ये महसूल सचिव तरुण बजाज यांनी विवरण भरण्याची तारीख वाढविण्यात येणार नाही, त्यामुळे शक्य तितक्या लवकर लोकांनी विवरण सादर करावे असे आवाहन केले होते.
मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यावर्षी आतापर्यंत विवरण सादर केलेल्या करदात्यांची संख्या अजूनही कमी आहे. यावर्षी केंद्र सरकारने विवरण सादर करण्यासाठी नवीन पोर्टल सुरू केले आहे. त्या पोर्टलमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये काही अडचणी आल्या होत्या. मात्र आता सध्या हे पोर्टल व्यवस्थित काम करत आहे. पुढील पाच दिवस या पोर्टलवर विवरण भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.