नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांमध्ये देशात बऱ्याच इलेक्ट्रिक वाहनांना आगी लागल्या आहेत. या प्रकरणाची दखल घेऊन राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण प्राधिकरणाने ज्या कंपन्यांच्या इलेक्ट्रिक वाहनांना आगी लागल्या आहेत, त्या कंपन्यांना नोटीस बजावली आहे.
प्राधिकरणाने अशा प्रकारच्या चार ते पाच कंपन्यांना नोटीस दिली असल्याचे समजते.
यासंदर्भात मिळालेल्या माहितीची स्वतः होऊन दखल घेऊन प्राधिकरणाने नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे. त्या कंपन्यांना वाहनांना आगी का लागत आहेत या संदर्भात विचारणा करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध प्राधिकरणाने का कार्यवाही करू नये असे विचारले आहे.
प्राधिकरणाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, यामुळे बरीच वित्तहानी त्याचबरोबर जीवित हानी झाली आहे. त्यामुळे या वाहनांच्या सुरक्षिततेबाबत शंका निर्माण झाली आहे. यासंदर्भात प्राधिकरणाकडे बऱ्याच तक्रारी आल्यानंतर प्राधिकरणाने नोटीस पाठविण्याची कार्यवाही केली आहे.
यासंदर्भात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने डीआरडीओला चौकशी करण्यास सांगितले आहे. या संदर्भातील अहवाल प्राधिकरणाकडे द्यावा असेही डीआरडीओला सुचविण्यात आले आहे. या विषयावर संबंधित मंत्रालयही समांतर कार्यवाही करीत आहेत.