नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पर्याय कोण हा प्रश्न पुन्हा एकदा कॉंग्रेसचे नेते शशी थरूर यांना विचारल्यावर त्यांनी याचे उत्तर दिले आहे. हा प्रश्नच अप्रस्तुत असल्याचे नमूद करताना ते म्हणाले हे अप्रासंगिक आहे. त्याचे कारण असे की आपण कोणा एका व्यक्तीला निवडत नाही तर आपण पक्षाला अथवा आघाडीला निवडत असतो.
सोशल मीडियावर आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले की भारताची विविधता, बहुलता आणि समावेशक विकास यांचे संरक्षण करण्यासाठी पक्षाची अथवा आघाडीची निवड आपण करत असतो आणि ते अमूल्य आहे.
पंतप्रधानांचा पर्याय जो कोणी असेल तो एक अनुभवी, सक्षम भारतीय नेता असेल. तो नेता लोकांच्या समस्यांप्रती उत्तरदायी असेल. त्याच्यामध्ये अहंकार असणार नाही.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत थरूर पुन्हा एकदा तिरूअनंतपूरम येथून आपले भविष्य आजमावत असून यावेळी केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. २००९ पासून ते सातत्याने या जागेवरून विजयी होत आले आहेत. त्यांनी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती.