नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी अटकेला आव्हान देणारी याचिका दाखल केली आहे. त्यावरील निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लॉण्डरिंग प्रकरणी ईडीने २१ मार्चला केजरीवाल यांना अटक केली. त्या कारवाईला आव्हान देत केजरीवाल यांनी उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला.
आता न्यायालयाच्या निर्णयाविषयी उत्सुकता असेल. दरम्यान, अटकेनंतर केजरीवाल यांचे वजन ४.५ किलोने घटल्याचा दावा दिल्लीच्या मंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी केला. त्यांच्या प्रकृतीच्या स्थितीविषयी आप कायदेशीर मदत घेईल, असेही त्यांनी म्हटले. तिहार तुरूंग प्रशासनाने मात्र केजरीवाल यांची प्रकृती उत्तम असल्याचा प्रतिदावा केला.
केजरीवाल यांना १ एप्रिलला तुरूंगात आणले गेले. त्यावेळी त्यांचे वजन ६५ किलो इतके होते. ते कायम असल्याचे प्रशासनाने म्हटले. केजरीवाल यांना १५ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे पंधरवडाभर त्यांना तिहार तुरूंगात रहावे लागणार आहे.