मुंबई – कॉंग्रेस नेते राहुल गांधी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील अलिकडे मंदिरात जाऊ लागले आहेत. शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हनुमान चाळीसा म्हणू लागले आहेत, असा चिमटा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काढला आहे.
विलेपार्ले येथील संन्यास आश्रम येथे महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरी महाराज सुवर्ण जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, सनातन संस्कृतीत आपल्या धर्माचे महत्त्व मोठे आहे. परंतु, काही लोक संकुचित वृत्तीने पाहत आहेत. धर्माच्या मार्गावर चालणे ही संस्कृती आहे. ज्यांना आपली परंपरा आणि संकृती माहित नाही, त्यांना हे कळलंच नाही की सनातन संस्कृती काय आहे? असाही टोला त्यांनी लगावला आहे.
काहींना वाटत आहे की इंग्रजांनी जो इतिहास लिहिला तो योग्य आहे. परंतु, इंग्रजांना आपल्यावर आक्रमण करायचे होते, त्यामुळे त्यांनी तसा इतिहास लिहिला. एकेकाळी मोठ-मोठ्या नेत्यांना मंदिरात जाण्याची लाज वाटत होती. आम्ही तो काळ पाहिला आहे. कारण कुणी मंदिरात जाताना पाहिले तर आपली सेक्युलर मते जातील याची भीती होती. परंतु, स्वतःला सेक्युलर म्हणणारे आता मंदिरात जाऊ लागले आहेत, अशा शब्दांत त्यांनी निशाणा साधला.