जळगाव – सामंजस्याने प्रश्न सोडवणे ही महाराष्ट्राची परंपरा आहे. पण समाजातील सामाजिक ऐक्य धोक्यात येतंय का अशी चिंता वाटत आहे. सामाजिक ऐक्य संकटात येऊ नये अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्र एकसंघ राहिला पाहिजे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.
जळगावात राष्ट्रवादीच्या नेत्यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी शरद पवार यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. तसेच जातीयवादाच्या मुद्द्यावर आज सविस्तर खुलासा केला.
शरद पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांचे ट्वीट मी पाहिले, त्यांचा मी आनंद घेत आहे. जातीयवादी उल्लेख हा माझ्या नावाने का सांगत आहेत, हे कळालेल नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थापना झाल्यानंतर पक्षाचे पहिले अध्यक्ष छगन भुजबळ होते. त्यानंतर मधुकरराव पिचड, अरूण गुजराती, सुनिल तटकरे ही समाजातील सगळ्या घटकांना घेऊन जाणारी पक्षाची नीती होती. त्यामधून पक्षाची नीती ही कोणतीही जातीयता दर्शवत नाही, अशा शब्दांत शरद पवार यांनी समाचार घेतला.
राज्यात आपलं सरकार येईल अशी अपेक्षा भाजपला होती, पण त्यांचा अपेक्षाभंग झाला. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन भाजप राज्य ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांचा अपेक्षा भंग झाला ते लोक काहीही करुन हे राज्य ताब्यात कसं घेता येईल हे पाहतात. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या नेत्यांवर ईडीच्या धाडी पडत असल्याचेही त्यांनी सांगितले. याचवेळी सामाजिक सलोखा बिघडवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याबाबतही चिंता व्यक्त करत राज ठाकरेंकडे बोलायला काही नाही, म्हणून ते बोलत आहेत, असा टोला लगाविला.
देशात विजेची टंचाई
गुजरात, मध्य प्रदेश, तामिळनाडू, आंध्रप्रदेश अशी सर्व देशात सध्या विजेची टंचाई आहे. कोळशाबाबतचे प्रश्न हे सर्वसामान्य लोकांना देशात सहन करावे लागत आहेत. महाराष्ट्रात स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे हे सगळे विजेचा विषय सोडवण्यासाठी गांभीर्याने पाहत आहेत. वीज टंचाईच्या विषयावर मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली असून नवीन पर्याय काय देता येतील यासाठी लवकरात लवकर चित्र दुरुस्तीसाठी काही अधिकाऱ्यांवर जबाबदारी दिली आहे. विजेचा विषय सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडून येत्या दोन ते तीन दिवसात प्रश्न सोडवण्यासाठी नवीन उपाययोजना मुख्यमंत्र्यांना सांगण्यात येईल, असेही पवारांनी स्पष्ट केले.