मुंबई : एमआयएमचे तेलंगणातील आमदार अकबरुद्दीन औवेसी हे औरंगाबादच्या दौऱ्यावर असून त्यांनी खुलताबाद येथील औरंगजेबच्या कबरीचे दर्शनही घेतले. औरंगाजेबच्या कबरीवर एमआयएमच्या नेत्यांनी माथी टेकवल्यानंतर आता राज्यासह संपूर्ण देशात नव्या वादाला तोंड फुटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अकबरुद्दीन औवेसींवर हल्लाबोल केला आहे, तसेच काश्मिरी पंडितांची सुरक्षितता धोक्यात असून पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी राजकारण सोडून याप्रकरणी लक्ष द्यावे असे राऊत म्हणाले आहेत.
औरंगजेबाच्या कबरीपुढे माथा टेकणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीचे दर्शन हा रितीरिवाज असू शकत नाही, वारंवार औरंगजेबाच्या कबरीसमोर गुडघे टेकवत महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न ओवेसींकडून होत आहे. औरंगजेबाने आमची मंदिरं उद्धवस्त केली, औरंगजेबाला ही महाराष्ट्राच्या याच मातीत गाडलं होतं, तुम्हालाही त्याच कबरीत जावं लागेल हे लक्षात ठेवा. ज्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं, त्यांनाही याच मातीत गाडू, त्यामुळे महाराष्ट्राला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात येत असेल तर आम्ही ते आव्हान स्वीकारायला तयार आहे असेही संजय राऊत यांनी म्हटले.
दुसरीकडे संजय राऊत यांनी “काश्मिरी पंडितांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षाचा मुख्य अजेंडा होता, काश्मिरी पंडितांच्या सोयी-सुविधा, त्यांच्या सुरक्षेसाठी 370 कलम हटविण्यात आले. याला शिवसेनेचा पाठिंबा राहिलेला आहे. तरीही या पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही, त्यांच्यासोबत सामान्य रहिवाशीही आजही असुरक्षितच आहे, त्यामुळे हनुमान चालिसा, लाऊडस्पीकर असे विषय मुद्दाम बाहेर काढून जनतेचं मन जिंकता येत नाही” याविषयीची खंत देखील बोलून दाखवली.
पुढे बोलताना राऊत म्हणाले, “काश्मिरमधील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न होतोय. सातत्याने काश्मिरी पंडितांच्या हत्या होत असून त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न महत्वाचा आहे. शिवसेना संवेदनशीलपणे या विषयाकडे पाहतोय, पण केंद्र सरकार काय करतेय? या प्रकरणी पंतप्रधान मोदी आणि अमित शाहांनी गांभीर्याने दखल देण्याची आवश्यकता आहे या दोघांनी केंद्रीय राजकारण बाजूला ठेवून लक्ष दिलं पाहिजे.” दरम्यान, आता ओवेसींच्या या कृतीवर राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे.