Devendra Fadnavis Phone Tapping Case – फोन टॅपिंग प्रकरणात आपली अटक होऊ शकते या भीतीतून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना फोडली असा आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला.
ते म्हणाले की ‘आम्ही सत्तेवर आल्यास फडणवीस यांच्या विरोधातील ही केस आम्ही पुन्हा खुली करू. नव्या सरकारमध्ये भाजप नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील बंद झालेल्या सर्वच खटल्यांची चौकशी पुन्हा सुरू केली जाईल असे ते म्हणाले.
राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सत्तेत असताना भाजप नेते प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, आशिष शेलार, गिरीश महाजन यांच्याविरुद्ध वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये चौकशी सुरू होती. जर तुम्ही आमच्या नेत्यांना अटक करू शकता, तर आम्ही तुमच्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना हात लावू शकत नाही का असा सवालही राऊत यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांच्यावर विरोधकांचे फोन टॅप केल्याच्या गंभीर आरोपाला सामोरे जावे लागले होते. त्यांना अटक होण्याची आणि दोषींना शिक्षा होण्याची भीती होती. या भीतीने त्यांनी शिवसेनेत फूट पाडली. २०१४ ते २०१९ या काळात मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीस यांनी गृहखात्याचेही नेतृत्व केले.
त्यावेळी त्यांनी तत्कालीन राज्य गुप्तचर विभागाच्या (एसआयडी) प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या मदतीने विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याचा आरोप होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये, मुंबई उच्च न्यायालयाने शुक्ला यांच्याविरुद्धचे दोन एफआयआर रद्द केले, त्या आता राज्याच्या पोलीस महासंचालक आहेत.