मुंबई : राज्यसभा निवडणुकांसाठी आता काही तास शिल्ल्क राहिले असताना राज्यातील महाविकास आघाडीला धक्का देणारा निर्णय समोर आला आहे. सध्या कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना राज्यसभेसाठी मतदान करण्याची परवानगी सत्र न्यायालयाकडून नाकारण्यात आली आहे. त्यामुळे 10 तारखेला होणाऱ्या निवडणुकीसाठी या दोघांनाही मतदान करता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची मात्र डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
नवाब मलिक आणि अनिल देशमुख या दोन्ही नेत्यांना मतदान करता यावे म्हणून राष्ट्रवादीने प्रयत्न करीत कोर्टाला अर्ज केला होता. ED ने देखील त्याला आक्षेप घेतला होता. पण कोर्टाने मतदानाची परवानगी नाकारल्यामुळे राष्ट्रवादीला मुंबई उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. उच्च न्यायालयनेही सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवल्यास आघाडीची मते दोनने घटणार आहेत. त्यामुळे आघाडीचं टेन्शन वाढलं आहे.
काय आहे कायदा ?
यापूर्वी 2017 साली राष्ट्रपती पदाची निवडणूक लागली असताना राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि रमेश कदम हे तुरुंगात होते. त्यावेळेला दोन्ही नेत्यांना मतदानाची परवानगी देण्यात आली होती. त्याचा धर्तीवर राष्ट्रवादीने आताही अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांच्या बाबत अर्ज केले होते. मात्र 27 एप्रिल 2019 रोजी निवडणूक आयोगाने आपले नियम अद्ययावत करुन नवीन नियमावली आपल्या वेबसाईटला टाकली आहे. त्यामुळे नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना परवानगी नाकारण्यात आली आहे .