भंडारा – इयत्ता बारावीच्या परिक्षेचा निकाल काल (दि.8) जाहीर झाला आहे. या परिक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुलींनी तर सर्वात मोठी बाजी मारत मुलांना मागे टाकले. मात्र निकालानंतर काही दुर्दैवी घटना देखील उघडकीस आल्या आहेत. परिक्षेत अनुत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. मात्र भंडारा जिल्ह्यातली विद्यार्थीनीने परीक्षेत उत्तीर्ण होऊन देखील आपली जीवनयात्रा संपवली आहे. मयुरी किशोर वंजारी (रा. लाखनी, भंडारा) असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. मयुरी ही लाखनी येथील समर्थ महाविद्यालयाची विद्यार्थिनी होती. मोलमजूरी करणाऱ्या आई-वडीलांचा भविष्यात आधार बनता यावा या दृष्टीकोनातून मयुरी वाटचाल करत होती. मयुरीने शिकवणी न लावता घरीच अभ्यास करून 12 वीची परीक्षा दिली होती. निकाल घोषित झाला आणि तिला 55 टक्के गुण मिळाले. हा निकाल बघून मयुरी निराश झाली. आपण आपल्या आई-वडिलांसाठी काहीच करु शकत नाही असे अनेक नकारात्मक विचार तिच्या मनात कल्लोळ करत होते. अखेर त्या विचारातून तिने स्वत:ला संपविले. निकाल पाहून घरी आल्यावर तिने घरातील तांदळाला अळी लागू नये म्हणून वापरण्यात येणारे औषध (पावडर) सेवन केले. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी मयुरीला तातडीने लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती अत्यवस्थ असल्याने पुढील उपचारासाठी तिला भंडारा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा दुर्देवी मृत्यू झाला. या घटनेची लाखनी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.