भारतात यंदाच्या वर्षी एकदिवसीय सामन्यांची विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. याच विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालीम म्हणून शुक्रवारपासून सुरू झालेल्या भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेकडे पाहिले जात आहे. त्यामुळे या तीनही सामन्यांत भारतीय संघात नवनवे प्रयोग केले जाणार आहेत. नवोदितांना रोटेशननुसार संधी दिली जाणार, तसेच संघातील नवोदित व वरिष्ठ यांच्यात समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मात्र, जे काही प्रयोग व्हावेत ते खरे व्हावेत व ही प्रयोगशिलता योग्य असावी ही अपेक्षा आहे.
केवळ हे तिन सामने आम्ही रोटेशनूसार खेळवले व प्रत्यक्ष विश्वकरंडकात आधीच ठरलेले खेळाडू खेळवले जाणार असे होऊ नये. पहिल्या सामव्यातून नियमित कर्णधार रोहित शर्माने माघार घेतल्याने हार्दिक पंड्या नेतृत्व करत आहे हाच मुळात पहिला प्रयोग आहे. कारण त्याच्यातील नेतृत्वगुण समोर येतील. दुसरे लोकेश राहुललाही खेळवले गेले म्हणजे निवड समिती व बीसीसीआयमधील कोणाची तरी मर्जी सांभाळली गेली हा दुसरा प्रयोग झाला. शार्दुल ठाकूरला खेऴले म्हणजे मुंबईतील सामन्यात मुंबईकरांची संघातील संख्या वाढवली हा तिसरा प्रयोग झाला.
तसे पाहायला गेले तर या स्पर्धेसाठी रंगीत तालीम करताना अंतिम संघ निवड कशी असेल हा उद्देश आहे. परंतु प्रत्यक्षात कर्णधार रोहित शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक फलंदाज) किंवा बीसीसीआयचा जावई बनलेला लोकेश राहुल (यष्टीरक्षक फलंदाज), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, महंमद शमी, महंमद सिराज, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव किंवा यजुवेंद्र चहल, अक्सर पटेल किंवा उमरान मलिक असे दहा खेळाडू तर जवळपास निश्चितच मानले जात आहेत मग एकाच जागेसाठी कीती प्रयोग करणार.
त्यातही शाद्रुल ठाकूर किंवा श्रेयस अय्यर यांच्यातीलच एकाला निवडले जाण्याचीही दाट शक्यता आहे. म्हणजेच हे प्रयोग केवळ दिखाऊ आहेत असेच चित्र सध्यातरी आहे. कारण यां नावांपलीकडे असे कोणतेही नवोदित सेकंड बेंचवर नाहीतच. संजू सॅमसन, पृथ्वी शॉ यांच्या नावावर यापूर्वीच फुली मारली गेली आहे. आता संघ व्यवस्थापन, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड, बीसीसीआय, निवड समिती यांनी आम्ही प्रयोग करणार असे म्हटलेच आहे तर पाहू त्यात कीती सत्य व तथ्य आहे. केवळ पारदर्शकता असावी इतकीच अपेक्षा आहे.