पुणे – सभागृहात यंदा गोंधळापेक्षा संवाद आणि सरकारकडून सकारात्मक उत्तरे देण्यात आली. त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज चांगले झाले. यावेळी विधान परिषदेबद्दल तांत्रिक माहिती चुकीची सांगून हेतूपरस्सर आरोप केल्यास आणि अशा व्यक्तींनी दिलगिरी व्यक्त न केल्यास, त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करून घेण्यात येईल, असा निर्णयही सभागृहात झाल्याचे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोदनाना भानगिरे, शिवसेना महिला शहरप्रमुख पूजा रावेतकर, बारामती लोकसभा संपर्क प्रमुख गीतांजली ढोणे उपस्थित होते.
मराठा आरक्षण, अमली पदार्थामुळे झालेली महाराष्ट्राची हानी, गुन्हेगारांचा उच्छाद, तुळजा भवानीचे दागिने चोरीप्रकरण यासह विविध विषयांवर झालेल्या चर्चेची माहिती दिली. तसेच तळवडे येथील आगीच्या घटनेतील जखमींची भेट घेऊन आवश्यक त्या सूचना दिल्या. यावेळी मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून जाहीर झालेली मदत अद्याप मिळाली नाही. त्याबाबत नातेवाईकांनी प्रश्न उपस्थित केला, याबाबत विचारले असता, मदत लवकरच देण्यात येईल. दिलेला शब्द पाळणार, त्यासाठी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर ही मदत लवकरच मिळेल, असेही गोऱ्हे यांनी सांगितले.
अधिवेशनाचे कामकाज; आरोप प्रत्यारोप
दहा दिवसांच्या अधिवेशन कालावधीमध्ये विधान परिषदेमध्ये ९४.५५ टक्के आमदारांची उपस्थिती होती. यामध्ये ४७ लक्षवेधी, १४ विधयके, १३३ विशेष उल्लेख सूचना, ९१ औचित्याचे मुद्दे आणि तीन आपत्कालीन चर्चांवर तपशीलवार चर्चा करण्यात आली. तरीही विरोधी पक्षनेत्यांना बोलून न दिल्याचा आरोप होतो. त्यांनी सभागृहात विविध विषयांवर भाषण केले असून, दहा दिवसांमध्ये ते सहा तास बोलल्याचेही उपसभापती यांनी सांगितले.
यासह विविध प्रश्नांवरही चर्चा…
कायदा सुव्यवस्था, शिक्षण, महिलांचे प्रश्न, प्रदूषणाचे प्रश्न, आरोग्य, अशा विविध विषयांवर सभागृहात चर्चा झाली. लोकायुक्त विधेयक संयुक्त चिकित्सा समितीकडे मंजूर झाले. त्याचबरोबर ‘कॅसिनो’बद्दलचे विधेयक सभागृहात मांडून ते मागे घेण्यात आल्याची घटनाही महत्त्वाची ठरली. उच्च तंत्र शिक्षण विद्यापीठ विषयक विधेयक, जमिनीचा गैरवापर होत असेल, तर महसूल विभागाने हस्तक्षेप करण्यासाठी मोहीम हाती घेण्याबाबतचे विधेयक, याबद्दलही सभागृहात चर्चा झाल्याचे गोऱ्हे यांनी सांगितले.