लाखणगांव – करोनाच्या भीतीने सर्वत्र संचारबंदी लागू आहे. या कालखंडामध्ये तसेच मागील काही काळापासून अनेक सार्वजनिक कार्यक्रम जसे- यात्रा, जत्रा, लग्न यांसाठी गर्दी जमवायची नाही, असा नियम सुरू झाल्याने अनेक जमलेले विवाह मुहुर्तांच्या तारखांना झालेच नाहीत, त्यामुळे यावर्षी मेंदी रंगलीच नाही, अशी म्हणण्याची वेळ आली आहे आणि याचा फटका ग्रामीण अर्थव्यवस्थेवर झाला आहे.
वैशाखासारख्या ऐन लग्न हंगामात लग्न सोहळे रद्द झाल्याने या सोहळ्यावर आधारित अनेक व्यवसाय ठप्प झाले आहेत. याचा परिणाम हजारो कुटुंबियांच्या उदरनिर्वाहावर झाला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात लग्न सोहळे पार पडतात. या सोहळ्यासाठी लागत असलेल्या विविध साधनसामग्रीला मोठी मागणी असते.
त्यामध्ये मंगल कार्यालय, आचारी, वाढपी, साऊंड सिस्टिम, डीजे, मंडप, वाजंत्री, पुरोहित, गोंधळ-भराडी, निवेदक, तसेच कापड व्यावसायिक, भांडे व्यावसायिक, बांगड्या व्यावसायिक, ब्युटीपार्लर, फर्निचर उत्पादक, टेलर, फटाके वाले, हार-तुरेवाले असे प्रकारचे व्यवसाय आधारित आहेत. हे व्यावसायिक तीन महिन्यात मिळणाऱ्या उत्पन्नावर वर्षभर आपली उपजीविका करत असतात.
मात्र, सध्याच्या परिस्थितीत यावर्षीचा पूर्ण लग्न हंगामच वाया जाणार आहे. या सोहळ्यावर आधारित व्यावसायिकांचे वार्षिक नियोजन कोलमडणार असून, अनेकांनी कर्ज काढून उभे केलेले व्यवसाय अडचणीत आले आहेत.
सरासरी तीन ते चार महिन्यांत जवळपास 70 ते 75 विवाह सोहळे प्रत्येक मंगल कार्यालयात पार पडतात. प्रत्येक मंगल कार्यालयाचे पंधरा ते वीस लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वार्षिक नियोजन कोलमडणार आहे.
– सतीश बेंडे पाटील, मंगल कार्यालयाचे मालक, मंचर