– अमित डोंगरे
आयपीएल स्पर्धेच्या यंदाच्या मोसमात काही खेळाडू सरस कामगिरी करताना दिसत आहेत जे युवा संघातून आले आहेत. त्यातही देशांतर्गत स्पर्धांमध्ये विशेषतः विजय हजारे व सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी केल्यामुळे ते प्रकाशझोतात आले. यंदाच्या स्पर्धेपूर्वी झालेल्या लिलावात त्यांना विविध संघांनी खरेदी केले. आता या नवोदितांमधून “लंबी रेस का घोडा’ कोणते खेळाडू ठरतील ते येत्या काळात कळेलच. पण त्यांना इतक्या मोठ्या व्यासपीठावर आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळत आहे हे काय कमी नाही.
यंदा 19 वर्षांखालील विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत ज्यांनी कमालीचे सातत्य दाखवले, त्या राजवर्धन हंगरगेकर, राज बावा यांच्यासह अन्य काही असे खेळाडू या स्पर्धेत खेळत आहेत. या खेळाडूंना सातत्याने संधी मिळाल्यास ते त्याचे सोने तर करतीलच पण पुढील किमान पाच वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटही गाजवतील. त्यात प्रशांत सोळंकी, के. एम. आसीफ, आयुष बदोनी, हर्षल पटेल, आवेश खान हे आणि असे कितीतरी खेळाडू आहेत ज्यांनी गेल्या काही मोसमांत आयपीएल स्पर्धेतील कामगिरीने आपला दर्जा सिद्ध केला आहे.
हल्ली कसोटी क्रिकेटपेक्षा या झटपट क्रिकेटकडे खेळाडूंचा कल वाढताना दिसत आहे. काही पालक तर आपल्या मुलाला किमान आयपीएल स्पर्धा खेळवा, अशी गळही प्रशिक्षकांना घालत आहेत. म्हणजे ही स्पर्धा किती प्रमाणात आर्थिक स्थैर्य देणारी ठरत आहे, हे लक्षात येते. आपण सगळ्यांनीच 1983 सालच्या विश्वकरंडक स्पर्धेच्या विजेतेपदावर आलेला “83′ हा चित्रपट पाहिला असेल. त्यावेळी भारतीय क्रिकेटची अवस्था काय होती ते दिसून आले. पण आज काय आहे ते जग पाहात आहे.
पूर्वी जागतिक क्रिकेटमध्ये भारताचा साधा उल्लेखही केला जात नव्हता. आता भारताशिवाय मालिका खेळण्याची हिंमतही कोणी दाखवत नाही. क्रिकेटमध्ये पैसा आला व येतच राहतो तो केवळ भारतामुळेच हे इंग्लंड व ऑस्ट्रेलियासारख्या प्रबळ क्रिकेट मंडळांनाही मान्य करावे लागले. त्यामुळेच गेल्या दोन दशकांचे भारतीय संघाचे वेळापत्रक तपासल्यास हेच दिसते की 1952 ते 1992 या चार दशकांत भारतीय संघाने परदेशात जितक्या मालिका खेळल्या त्याच्या किमान पाच पट जास्त मालिका भारतीय संघाने 1992 ते 2022 या काळात खेळल्या आहेत.
या देखील समोरून आपल्याला मालिकेचे आमंत्रण आले हे जास्त विशेष. मागे एकदा इंग्लंडवरुन आपला संघ पाचही कसोटी सामने गमावून मायदेशी परतण्यासाठी लंडनच्या हिथ्रो विमानतळावर दाखल झाला तेव्हा तेथील कस्टम अधिकाऱ्याने टोमणा मारला होता की, तुम्ही आमचा उन्हाळा वाया घालवला. आता परिस्थिती इतकी बदलली आहे की आपल्या संघाला तेच बोलावतात व त्यांचा सोकॉल्ड क्रिकेट समर कसा चांगला व्यतीत होईल हे पाहतात, असे कालाय तस्मै नमः