पुणे – सलग चार वेळा नगरसेवक राहिलेल्या, महापालिकेतील विविध समित्यांसह महापौर पदही भूषवलेल्या आणि कसबा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार ‘मुक्ता टिळक’ यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. कर्करोगाने खासगी रुग्णालयात त्यांचं निधन झाले. त्या 57 वर्षांच्या होत्या. त्यांच्या मागे पती शैलेश, मुलगी चैत्राली, मुलगा कुणाल, जावई, सून असा परिवार आहे. भाजपच्या अत्यंत धडाडीच्या, तळागाळासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून त्यांची ख्याती होती.
दरम्यान, मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर अवघ्या आठवड्याभरात राष्ट्रवादीच्या नेत्या ‘रूपाली ठोंबरे पाटील’ यांनी आमदार होण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मी कसबा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास तयार आहे’. असं त्या काही दिवसांपूर्वी म्हणाल्या होत्या. मात्र, त्यांच्या या विधानानंतर पक्षाने त्यांना घरचा आहेर दिल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, आता यावरून चर्चा सुरू झाली असतानाच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांनी प्रथमच जाहीरपणे उमेदवारीचा दावा केला आहे. “पोटनिवडणुकीसाठी टिळक कुटुंबीयांचा विचार व्हावा’, अशी स्पष्ट भूमिका शैलेश टिळक यांनी घेतली आहे. तसेच, निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे पक्षाच्या नेतृत्वाला लवकरच कळविण्यात येईल, असं देखील ते यावेळी म्हणाले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
नेमकं यावेळी शैलेश टिळक काय म्हणाले…
ते म्हणाले, “दिवंगत आमदार मुक्ता यांची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, अशी भावना आहे. मीही उमेदवारीसाठी इच्छुक असून चिरंजीव कुणाल याचेही वेगळ्या माध्यमातून जनसंपर्काचे काम सुरू आहे. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारीसाठी टिळक कुटुंबीयांचा प्राधान्याने विचार करावा. पक्षाच्या नेत्यांशी अद्याप या संदर्भात चर्चा झालेली नाही.
मात्र, ही भावना लवकरच नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. उमेदवारी कोणाला द्यायची, याचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील’, असं ते यावेळी म्हणाले. मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर टिळक कुटुंबीयांपैकी एकाला उमेदवारी द्यावी, असा मतप्रवाही पक्षाच्या एका गटाचा होता. दरम्यान, शैलेश टिळक यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात विरोधकांच्या सुद्धा आगामी हालचाली सुरु झाल्याचं देखील बोललं जात आहे.