मुंबई – महाविकास आघाडीचा आज मुंबईत महामोर्चा काढला जाणार असून त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आमदार-खासदारांकडून शिवाजी महाराजांविषयीची वादग्रस्त वक्तव्य, राज्यपालांची विधानं आणि राज्यातून बाहेर जाणारे उद्योग या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. या मोर्चातून सरकारचा निषेध केला जाणार आहे. त्यात भाजपाकडूनही मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून ‘माफी मांगो आंदोलन’ केलं जाणार आहे. दरम्यान, या याच मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी माध्यमांशी बोलतांना प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार म्हणाले,’हा मोर्चा राजकारणासाठी नाहीतर मराठी अस्मितेसाठी, हा मोर्चा मराठी माणसांचा आहे, सीमाभागामध्ये ३० लाख मराठी लोक राहतात. आज सुद्धा आपल्या महाराजांचा अवमान झाला आणि त्या ठिकाणी आंदोलन त्यांनी घेतलं तर त्यांना जेल मध्ये टाकले जाते. सीमा भागावरील गावामध्ये अनेक अडचणी आहे. अशातच आज कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणतात, की कुठल्याच मंत्रांनी तेथे आले नाही पाहिजे. अशावेळी मी एक या मोर्चा द्वारे संदेश देऊ इच्छितो की, तुम्ही महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका’ असेही ते म्हणाले आहे.