नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय स्तरावर चीन आणि भारतातील सीमावाद पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे. चीनने भारताच्या हद्दीत पुन्हा एकदा घुसखोरी करत अरूणाचल प्रदेशात अख्ख गावच वसवलं आहे. सॅटेलाईट फोटोतून ही बाब समोर आली आहे. यावर चीनने खळबळजनक दावा केला आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हंटले कि, चीन आपल्या जमिनीवर बांधकामाचे कार्य करत आहे. आणि हे पूर्णतः अखंडतेची बाब आहे. भारत-चीनच्या पूर्वेकडील सेक्टर अथवा जंगनान प्रांतावर (दक्षिण तिबेट) चीनचे मत ठाम आणि स्पष्ट आहे.
भारत नेहमी अरुणाचल प्रदेश त्यांचा अविभाज्य भाग आहे, असे सांगतो. परंतु, आमच्या जमिनीवर वसवलेल्या कथित अरुणाचल प्रदेशाला कधीच मान्यता दिलेली नाही, असेही चीनने म्हंटले आहे. अरुणाचल प्रदेश तिबेटचाच भाग असून ‘आपल्याच प्रदेशात चीनचे बांधकाम ही सार्वभौमत्वाची बाब आहे, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांच्या वेबसाईटवर सांगितले आहे.
दरम्यान, सॅटेलाईट फोटोतून दिसून आलेल्या दृश्यानुसार चीनने अरुणाचलमध्ये हे गाव वसवले आहे. हे फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजी आहेत. चीनने सीमा ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवले आहे. या गावात १०१ घरं बांधले आहेत. भारताने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय सुुरक्षेच्या प्रश्नावर आपण सातत्याने लक्ष ठेवून आहोत. असे म्हटले आहे. भारतीय सार्वभौमत्वाचा भंग करू नये असा चीनला इशारा देत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की या सर्व घडामोडीकडे सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. आपले सार्वभौमत्व आणि भौगोलिक संलग्नता यांच्या सुरक्षेसाठी सर्व उपाय योजना करेल.