मुंबई – राज्यातील किमान अर्धा डझनहून अधिक जिल्ह्यात करोना संसर्गितांच्या संख्येत मोठी वाढ आढळत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रसाराला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोन दिवसांत टास्क फोर्सची बैठक घेऊन उपाययोजना जाहीर करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत 150 टक्के अधिक असण्याचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे, सोलापूर, सांगली आणि साताऱ्यातील स्थिती शिस्तीच्या अभावामुळे चिंताजनक आहे. 14 डिसेंबरला सक्रिय बाधितांची संख्या सहा हजार 481 होती, ती 28 डिसेंबरला 11 हजार 492 वर पोहोचली आहे. दुसऱ्या लाटेपेक्षा 150 टक्के अधिक संसर्गित संख्या असण्याची शक्यता केंद्राने वर्तवली आहे.
अशा स्थितीत युद्धपातळीवर स्थिती हाताळण्याशिवाय कोणताही पर्याय आमच्या पुढे राहिला नाही. आम्हाला करोना उपाययोजना लादाव्याच लागतील, असे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
औषधे आणि यंत्रणा उभारण्यासाठी चार हजार 235 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून त्यात राज्य सरकार एक हजार कोटी, केंद्र सरकार एक हजार 100 कोटी आणि एसडीआरएफ आणि डीपीडीसीतून दोन हजार कोटींचा निधी आरोग्य खात्याला वर्ग करण्यात येणार आहे. आम्ही पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत असलेल्या त्रुटींचा विचार करून त्या आता राहणार नाहीत, याची खातरजमा केली आहे.
त्यामुळे या लाटेत कोणतीही अडचण येणार नाही याची आम्हाला खात्री आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आमच्याकडे पुरेसा निधी आणि मनुष्यबळ आहे, असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
दुसरी लाट शिखरावर होती त्यावेळी संसर्गितांची राज्यात संख्या 8.63 लाख होती. यावेळी ती 13 लाखांचा टप्पा ओलांडेल. त्यातील आठ लाख जण घरातील विलगीकरणात असतील. तर पाच लाख जणांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असा अंदाज आरोग्य खात्याने बांधला आहे.