नवी दिल्ली – देशात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 13 हजारांहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले असून, करोना प्रकरणांचा सध्याचा वेग पाहता सावध राहण्याची गरज असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या 82402 आहे. एका आठवड्यात सरासरी दररोज 8009 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गेल्या तीन-चार दिवसांत प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे, त्यासाठी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. आम्ही राज्यांना सतत मार्गदर्शन करत आहोत, असेही अग्रवाल यांनी सांगितले.
महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातमध्ये करोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे. लव अग्रवाल म्हणाले, व्हायरस वेगाने लोकांना संक्रमित करत असून त्यासंदर्भात आपल्याला मिशन मोडमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. जगात सध्या 3 लाख 30 हजार 379 ओमायक्रॉन प्रकरणे आहेत आणि आतापर्यंत या प्रकारामुळे जगभरात 59 मृत्यू झाले आहेत. ओमायक्रॉनची दक्षिण आफ्रिकेत 96% प्रकरणे, यूकेमध्ये 59% प्रकरणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संक्रमन दुप्पट होण्याचा कालावधी दोन ते तीन दिवस आहे. ओमायक्रॉनच्या सुरक्षेबाबत अजून डेटा येणे बाकी आहे. असे आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, जेव्हापासून ओमायक्रॉनची प्रकरणं समोर येत आहेत, तेव्हापासून भारतीय आरोग्य व्यवस्थेकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत. केंद्रीय पथकं पाठवून राज्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे.
आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, संसर्गातून बरे झाल्यानंतर 9 महिने प्रतिकारशक्ती राहते. भारतातील तीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती 10 महिने टिकते. मात्र लस प्रामुख्याने रोगापासून बचाव करणारी आहे, संसर्ग प्रतिबंधित नाही.