हल्दवानी – काॅंग्रेसने उत्तराखंडला विकासापासून वंचित ठेवले, महत्त्वाच्या योजना प्रलंबित ठेवल्या, त्यामुळे राज्यातील जनतेला त्रास सहन करावा लागला, असा आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. पंतप्रधान म्हणाले, राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्यातील क्षमतांचा उपयोग करून हे दशक उत्तराखंडचे दशक बनण्यासाठी भारतीय जनता पक्ष दिवस रात्र एक करून काम करत आहे. 17,500 कोटी रुपयांच्या 23 हून अधिक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केल्यानंतर पंतप्रधान मोदी उत्तराखंड जनतेला संबोधित करताना बोलत होते.
काँग्रेसचे नाव न घेता पंतप्रधान म्हणाले, स्वातंत्र्य मिळाल्यापासून उत्तराखंडच्या जनतेने दोन प्रवाह पाहिले आहेत. एक प्रवाह डोंगराच्या विकासाला वंचित ठेवण्याचा आहे आणि दुसरा प्रवाह डोंगराच्या विकासासाठी रात्रंदिवस एक करण्याचा आहे. पहिल्या प्रवाहातील लोकांना नेहमीच तुम्हाला विकासापासून वंचित ठेवायचे आहे. ते रस्ते, वीज, पाणी देण्यासाठी कष्ट करण्यापासून दूर पळतात. उत्तम रस्ते आणि चांगल्या सुविधांअभावी इथले लोक उत्तराखंड सोडून इतरत्र स्थायिक झाले आहेत. आज मी समाधानी आहे की उत्तराखंडच्या जनतेने… देशातील जनतेने… देशाची दुरावस्था करणाऱ्यांना ओळखले आहे.
भाजपचे ‘डबल इंजिन’ सरकार ‘सबका साथ, सबका विकास’ या मंत्रासोबत देशाला वेगाने नव्या उंचीवर नेण्यात व्यस्त आहे. काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांवर हल्लाबोल करत पंतप्रधान म्हणाले की, आज जेव्हा जनतेला त्यांचे सत्य कळले आहे, तेंव्हा या लोकांनी अफवा पसरवण्याचे काम सुरू केले आहे. उत्तराखंडच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण होत आहेत. या वर्षांमध्ये राज्याने अशाही सरकार चालवणाऱ्यांना पाहिले आहे, जे म्हणत होते “उत्तराखंडला लुटा मात्र आमचे सरकार वाचवा”. या लोकांनी उत्तराखंडला दोन्ही हातांनी लुटले. ज्यांना उत्तराखंडबाबत प्रेम आहे ते असा विचारही करू शकत नाहीत.