सोलापूर (प्रतिनिधी) – सोलापुरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढू लागल्याने चिंता वाढली आहे. या साथीवर नियंत्रण आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजनेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पालकमंत्र्यांची गरज भासू लागल्याची मागणी वाढल्यावर सोलापूरला तिसरा नवीन पालकमंत्री नियुक्त करण्याचा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांनी घेतला. त्यानंतर तातडीने बुधवारी राज्याचे सचिव अंशू सिन्हा यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.दरम्यान, चार महिन्यात सोलापूरला राष्ट्रवादी कॉंग्रेसचा तिसरा पालकमंत्री मिळाला आहे.
राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर सोलापूरचे पालकमंत्री म्हणून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. दोन महिने त्यांचा कार्यकाळ चालल्यानंतर करोनाची साथ सुरू झाली. या साथीच्या उपाययोजनेबाबत वळसे-पाटील यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारेच प्रशासनाकडून दोनदा आढावा घेऊन सूचना दिल्या. प्रकृती अस्वस्थामुळे सोलापुरात येऊन कामकाज करणे अशक्य असल्याने त्यांनी कळविल्यावर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची सोलापूरचे पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
पालकमंत्रीपदी नियुक्ती झाल्यावर आव्हाड यांनी तातडीने सोलापुरात येऊन जिल्हाधिकारी कार्यालयात करोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनेचा आढावा घेतला. त्यानंतर मुंबईला परतल्यानंतर आव्हाड यांनी स्वत:ला होम क्वॉरटाईन करून घेतल्याचे सांगण्यात आले. अशात मंगळवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरचे आमदार तथा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची सोलापूरचे पालकमंत्री बुधवारी नियुक्ती केली आहे.
आज घेणार तातडीने बैठक
महाआघाडी सरकारच्या कारकीर्दीत सोलापूरचे तिसरे पालकमंत्री म्हणून पदभार घेणारे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे गुरुवारी तातडीने सोलापुरात दाखल होणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात करोना साथीच्या प्रतिबंधासाठी करण्यात येणा-या उपाययोजनांचा आढावा घेणार असल्याचे सांगण्यात आले.