जम्मू – अमली पदार्थविरोधी देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून आज 1 लाख 44 हजार हजार किलो अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या देखरेखीखाली ही कारवाई करण्यात आली. जाळून नष्ट केलेल्या या अमली पदार्थांची किंमत तब्बल 2,381 कोटी रुपये होती.
देशभरातील विविध भागांमधून अमली पदार्थविरोधी विभागाने समन्वयाने हे ड्रग्ज जमा केले होते असे अमित शहा यांनी दिल्लीत झालेल्या “ड्रग ट्रॅफिकींग ऍन्ड नॅशनल सिक्युरीटी’ या विषयावरील प्रादेशिक परिषदेमध्ये बोलताना सांगितले.
2006 ते 13 दरम्यान अमली पदार्थांच्या तस्करीविषयीची एकूण 1,250 प्रकरणे दाखल झाली होती. 2014- ते 2023 दरम्यान 3,700 प्रकरणे दाखल झाली होती. यापूर्वी 1.52 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले होते आणि आज याच ड्रग्जचा साठा 3.94 लाख किलो झाला होता.
म्हणजे जप्त केलेल्या ड्रग्जमध्ये 160 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जम्मूमध्ये 6727 किलो जप्त केलेले ड्रग्ज नष्ट करण्यात आले आणि “एनसीबी’ने देशाच्या विविध भागांमध्ये 1,44,000 किलोग्राम ड्रग्ज नष्ट केले.
आज करण्यात आलेल्या कारवाईसाठी सर्व राज्ये आणि “एनसीबी’ला अमित शहा यांनी धन्यवाद दिले. गृहमंत्र्यांनी हे पाऊल सर्व राज्यांमध्ये लागू करण्याची विनंती मुख्यमंत्री आणि नायब राज्यपालांना केली होती. जोपर्यंत आपण युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती करत नाही तोपर्यंत आपण ही लढाई जिंकू शकणार नाही, असे अमित शाह म्हणाले.