शिवसेनेचा कर्नाटक सरकारला इशारा
मुंबई : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात चांगलेच तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील आदेश मिळेपर्यंत दोन्ही राज्यातील एसटी वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. तर, शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याचे दहन करणाऱ्यांची गाठ शिवसेनेशी आहे. महाराष्ट्रात देखील कन्नड लोक राहतात हे कर्नाटक सरकारने लक्षात ठेवावे, असा इशारा शिवसेनेचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी दिला आहे.
कन्नड वेदिका संघटना आहे की वेडीका संघटना ती वेड्यांचीच संघटना आहे. महाराष्ट्राला नेहमी आपल्या हक्कासाठी लढा द्यावा लागला आहे. बेळगाव, कारवार निपाणीमधील जनता महाराष्ट्रात येण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत आहे. मराठी माणसावर पराकोटीचा अन्याय कर्नाटक सरकारने केला आहे. पण महाराष्ट्राने प्रतिक्रिया कधीही दिली नाही, असे अरविंद सावंत यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना म्हटले.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर उभे करुन गोळ्या घाला, असे वादग्रस्त वक्तव्य कर्नाटक नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष भीमाशंकर पाटील यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटत असतानाच कर्नाटकात कन्नड वेदिका संघटनेनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. सीमाप्रश्नाला उकळी फुटल्यानंतर दोन्ही राज्यातील समर्थक आपली भूमिका मांडत रस्त्यावर उतरत आहेत.
कर्नाटकमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा प्रतिकात्मक पुतळा काल संध्याकाळी जाळण्यात आला. त्याची प्रतिक्रिया लगोलग कोल्हापूर येथे उमटली. युवासेनेने जिल्हा अधिकारी हर्षल सुर्वे आणि सहकाऱ्यांनी काल रात्री कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यावर काळी शाई फेकत जोडे मारो आंदोलन केले. परिणामी,वातावरण तापू लागल्याने दोन्ही राज्यातील परिवहन महामंडळाने दक्षतेचा उपाय म्हणून एसटी सेवा बंद केली आहे.