पिंपरी, (प्रतिनिधी) – चैतन्याचा जागर या राजेंद्र घावटे लिखीत पुस्तकास येवला येथील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानचा “राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार” जाहीर झाला आहे. पुरस्कार वितरण चार जून रोजी शिर्डी येथे होणार आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी कळविले आहे.
शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून कविता संग्रह ४७ , कथा संग्रह १७, कादंबरी ५ आणि ललित लेखसंग्रह ११ अशा एकूण ८० विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या. प्राप्त कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एका कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
ललित लेखनासाठी पिंपरी चिंचवडचे लेखक राजेंद्र घावटे यांच्या “चैतन्याचा जागर” या ललित लेख संग्रहाला पुरस्कार जाहीर झाले आहेत. चैतन्याचा जागर या विचारसंग्रह ग्रंथाला संत साहित्याचे गाढे अभ्यासक वै. डॉ. रामचंद्र देखणे यांची प्रस्तावना तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा शुभसंदेश लाभला आहे.