पाहता पाहता हेही वर्ष सरत आले. असं म्हणतात आयुष्य हे एक पुस्तक आहे. आणि या पुस्तकाची जशी पाने पलटावी तसतशी वर्षे सरतात. मात्र या पानांच्या आठवणी आपल्या आयुष्याला अनुभवाची भली मोठी शिदोरी देऊन जातात. अशी शिदोरी जी आपल्या वर्तमानात आपल्या वर्तनाला दिशा देऊन भविष्याचा मार्ग सुकर करते. जुन्या वर्षाने दिलेल्या आठवणी आजही मनाच्या कोपऱ्यात तशाच साठून राहिल्या आहेत. परंतु याचबरोबर प्रत्येकाच्या मनाला नव्या वर्षाच्या नव्या औत्सुक्याची ओढ लागली आहे.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काही दोन तीन दिवस बाकी राहिले आहेत. काहीजणांना थर्टी फर्स्टच्या रंगीबेरंगी पार्टीचे वेध लागले आहेत. तर नव्या वर्षाच्या स्वागतासाठी काही ध्येयाने झपाटलेली व्यक्तिमत्त्वे नव्या संकल्पांच्या शुभारंभासाठी सज्ज झालेले आहेत. कारण आज आखलेले छोटे छोटे संकल्प उद्याच्या भव्यदिव्य यशाची नांदी ठरणार असतात. ठरवलेले संकल्प कधी तडीस जातात तर कधी मोडीस येतात; परंतु नव्या उमेदीने नव्या संकल्पांची आखणी करणे यात अधिक महत्त्वाचे. पु. ल. देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे, कुणाचा गणपती दीड दिवसाचा, तर कुणाचा दहा दिवसांचा असतो, तीच गोष्ट संकल्पाची. संकल्प प्रत्यक्ष आचरणात आणण्यापेक्षा त्या संकल्पाची आखणी करण्यात मिळणारा आनंद जरा निराळाच असतो.
सकाळी लवकर उठणे, व्यसन सोडणे, नियमित वाचन करणे, पैशाची बचत करणे, डायरी लिहिणे, वजन कमी करणे, नियमित व्यायाम/योगा करणे, असे दरवर्षी हमखास आखले जाणारे तात्पुरते संकल्प सर्रास कागदावर उमटत असतात. मात्र, त्यातील किती संकल्प आणि किती प्रमाणात पूर्ण होतात हे काही वेगळे सांगायची गरज नाही.
लवकरच 2020 हे साल सुरू होत आहे. 2020 म्हटले की आठवतात ते स्व. डॉ. अब्दुल कलाम. भारताचे लोकप्रिय माजी राष्ट्रपती. कलामांनी 2003 साली “व्हिजन 2020′ देशवासीयांसमोर ठेवले. यात 2020 साली भारत हे राष्ट्र जगातील प्रगत, विकसित राष्ट्र म्हणून नावारूपास यावे हा त्यांच्या या घोषणेमागचा मुख्य उद्देश होता. मात्र, आज आपण 2020 मध्ये प्रवेश करताना आपण कलामांनी पाहिलेल्या स्वप्नापासून थोडे अंतर आजही दूर असल्याचे दिसते. आंतरराष्ट्रीय आव्हाने, राजकारण, नैसर्गिक आपत्ती अशी अनेक कारणे या स्वप्नपूर्तीत अडसर ठरली; परंतु यात सर्वांत महत्त्वाचे कारण ठरले ते लोकांची ध्येयहीन मानसिकता. स्वतःचा विचार करीत स्वार्थाने बरबटलेल्या समाजाला राष्ट्राच्या स्वप्नाचा विसर पडून गेला. दरवर्षी नववर्षाला आपण स्वतःसाठी संकल्प तर आखतोच परंतु 2020 या वर्षी आपल्याला या राष्ट्राच्या उन्नतीसाठी काही चांगल्या गोष्टींची सवय लावून घ्यायची आहे. देशाने आपल्याला नेहमीच भरभरून दिले आहे. आता वेळ आहे ती आपण देशाला काहीतरी देण्याची.
आता याची सुरुवात करायची झाल्यास एक काम आपल्याला प्रामुख्याने करावे लागेल आणि ते म्हणजे राष्ट्रहिताच्या किंवा समाजविधायक कामासाठी एकजुटीने काम करणे. आज देशात भ्रष्टाचार, अंधश्रद्धा, कुपोषण, दारिद्य्र, शोषण, प्रदूषण, शिक्षण आणि इतर गोष्टींपासून वंचितता अशी अनेक आव्हाने उभी आहेत. आपण यासाठी सोशल मीडियावर किंवा रस्त्यावर उतरून आवाज उठवतो. परंतु यातून खरेच प्रश्न सुटतात का? हेही पाहणे महत्त्वाचे आहे. वृक्ष तोडीविरोधात रस्त्यावर उतरतात परंतु प्रत्यक्षात स्वतः किती झाडे लावतात? प्रदूषणाचे तोटे जाणतात परंतु त्या प्रदूषणासाठी आपण किती जबाबदार आहोत याचा विचार करतात का? मुळात कोणतीही गोष्ट वरवर दिखाव्यासाठी करण्यापेक्षा स्वतःपासून बदलाची सुरुवात करणे केव्हाही चांगले.
महागाई, दहशतवाद, भ्रष्टाचार यासारख्या समस्या आज देशापुढे आहेत. आणि याच समस्या व्हिजन 2020 साकार होण्यात अडसर ठरत आहेत. यासाठी शासन कटिबद्ध आहेच; परंतु लोकांच्या मतावर सत्तेत असणाऱ्या शासनावर लोकांची पकड असणेही महत्त्वाचे आहे. लोकशाही मार्गाने या आव्हानात्मक समस्या सोडविण्यासाठी लोकसहभाग वाढणे ही काळाची गरज आहे. आजच्या भारताची मदार ही तरुणाईच्या खांद्यावर आहे. तरुण पिढी ही शिक्षित आहे, पण जर ती सुजाणतेने वागली तर अनेक समस्या सोडवू शकते. आपण या देशाचे काही तरी देणे लागतो या विचाराने आपण आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. तरुणाईने जर आपण एक जबाबदार मतदार म्हणून जरी आपला हक्क बजावला किंवा राजकारणात स्वतः सहभाग घेतला तर देशाचं चित्र नक्कीच बदलेल. स्वतःचा विकास साधताना देशाला किंवा समाजाला त्याचा काय फायदा होईल. 2020 या वर्षातच व्हिजन 2020 साकार करण्यासाठी प्रयत्न करू या.
सागर ननावरे