पंढरपूर : तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष केसीआर आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. अशी टीका राज्यातील राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. दरम्यान, आज केसीआर यांनी पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्यानंतर सरकोली गावात जाहीर सभा घेतली. या सभेत भगीरथ भालके यांचा बीआरएसमध्ये प्रवेश झाला. यावेळी बोलताना केसीआर यांनी महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी केलेल्या टीकेला उत्तर देत नेत्यांना खोचक सवाल देखील केला आहे.
यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर दिले आहे माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले,’के चंद्रशेखर राव यांनी आधी त्यांचा पक्ष सांभाळला पाहिजे. दिल्लीत काहीतरी झालं ना? त्यांचा पक्ष दिल्लीत फुटला ना? तो त्यांनी सांभाळावा. त्यांचं राज्य सांभाळावं. त्यांच्या राज्यातल्या लोकांना सुविधा द्याव्यात. महाराष्ट्रात आम्ही समर्थ आहोत. महाराष्ट्र सरकारने गेल्या ११ महिन्यांत जनतेला सोयीसुविधा दिल्या आहेत. सर्व घटकांसाठी कामं केली आहेत. त्यामुळे त्यांची चिंता आम्हाला नाहीये” असं म्हणत शिंदे यांनी टोला लगावला आहे.
ते पुढे म्हणाले,“लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असतो. पण त्यानंतर मतं देण्याचा अधिकार जनतेच्या हातात असतो. पांडुरंगाचं दर्शन घ्यायला ते आले. त्यांच्याबद्दल जास्त भाष्य करणं मला उचित वाटत नाही. त्यांनी दर्शन घेतलं आणि ते रवाना झाले”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.
तत्पूर्वी, “गेल्या काही दिवसांत एक गोष्ट मला खटकते. आज देशाचं ध्येय काय आहे? काही आहे की विना ध्येयाचेच आपण भटकत आहोत? काय चाललंय या देशात? प्रत्येक भारतीयानं यावर विचार करायला हवा. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षं उलटली. ७५ वर्षं हा काही कमी काळ नाहीये”, असे केसीआर यावेळी म्हटले.
पुढे त्यांनी, “निवडणुका होत असतात. कुणी ना कुणी जिंकतच असतं. किती पक्षांना आपण पाठिंबा दिला. महाराष्ट्रासारख्या राज्यात मला एक पक्ष सांगा ज्यांना राज्य करण्याची संधी मिळाली नाही. काँग्रेसनं ५० वर्षं राज्य केलं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजपाला तुम्ही संधी दिली. करायचं असतं, तर यापैकी कुणीतरी एकानं तरी काम केलं असतं. तेलंगणासारख्या नव्या राज्यात शेतकऱ्यांसाठी सर्व योजना राबवल्या जाऊ शकतात तर महाराष्ट्रात का नाही? महाराष्ट्र तर एक मोठं, श्रीमंत राज्य आहे. इथे काय कमी आहे?”, असा प्रश्न केसीआर यांनी उपस्थित केला आहे.