नवी दिल्ली : देशभरात सध्या बहुतांश राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाचे आगमन झाले आहे.राजधानी दिल्लीतही पावसामुळे वातावरणात बदल झाला असून येथेही आज पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर प्रदेश, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंडसह इतर राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर देशाच्या उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये मागच्या २४ तासापासून वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुरू आहे. याशिवाय मिझोराम, नागालँड आणि मणिपूरमध्येही चांगला पाऊस पडला आहे. राजधानी दिल्लीत सध्या G20 शिखर परिषद सुरु आहे. या ठिकाणी शनिवारी रात्री मुसळधार पावसाची नोंद झाली. एवढेच नाही तर, आज (रविवार) पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागानुसार, रविवारी दिल्लीत हलक्या पावसासह ढगाळ वातावरण राहण्याची अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेशमध्येही शनिवारी झालेल्या पावसामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 3 अंश सेल्सिअसपर्यंतची घसरण दिसून आली. यामुळे राज्यातील जनतेला उष्णतेपासून मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने उत्तर प्रदेशातील बस्ती, गोंडा, श्रावस्ती, बहराइच, बाराबंकी, रायबरेली आणि इतर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे.
उत्तराखंडमध्येही पावसानंतर वातावरण आल्हाददायक आहे. डेहराडून, पिथौरागढ, बागेश्वर आणि नैनितालमध्ये विजांच्या कडकडाटांंसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर, हवामान विभागाने पुढील 3 ते 4 दिवस महाराष्ट्र, मध्य प्रदेश, तामिळनाडूच्या विविध ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा जारी केला असून उर्वरित देशात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे.