कोलकता – पश्चिम बंगालमधील भाजपचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी बुधवारी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावलेल्या तृणमूल कॉंग्रेसची खिल्ली उडवली. तृणमूल प्रादेशिक पक्षही राहणार नाही, असे त्यांनी म्हटले. राष्ट्रीय शक्ती बनण्याचे स्वप्न तृणमूल पाहात होता, पण राष्ट्रीय दर्जा गमावल्याने त्या पक्षाचे स्वप्न भंगले आहे.
तृणमूल हा चोरांचा आणि लुच्चांचा पक्ष आहे. तो देशातील सर्वांत भ्रष्ट पक्ष आहे. त्या पक्षाच्या बंगालमधील सरकारने प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक विभागात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे.
बंगाली जनतेला लुटण्याची एकही संधी तृणमूलचे नेते सोडत नाहीत, अशा आरोपांची सरबत्ती अधिकारी यांनी एका सभेत बोलताना केली. त्यांच्या टीकेला तृणमूलने तातडीने प्रत्युत्तर दिले. अधिकारी निराधार आरोप करत आहेत.
इतर कुणी सोडाच; भाजपही अधिकारी यांना गांभीर्याने घेणार नाही. राजकीय संधिसाधू असणाऱ्या अधिकारींमध्ये कुठलीही विश्वासार्हता नाही. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गमावला असला तरी बंगालमध्ये भाजपशी लढण्यास तृणमूल पूर्ण समर्थ आहे, असे तृणमूलचे प्रवक्ते कुणाल घोष यांनी म्हटले.